मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया राबवून डिसेंबरमध्ये सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. पुणे मंडळाच्या सोडतीची घोषणा घराच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे, कोल्हापूर, सोलापूरमधील इच्छुकांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

पुणे मंडळाने मागील काही वर्षांपासून सोडतीचा धडाका लावला आहे. वर्षभरात किमान दोन सोडती काढण्यात येत आहेत. मंडळाने २०२४ मध्ये आतापर्यंत दोन सोडत काढल्या असून आता तिसऱ्या सोडतीची तयारी सुरू केली आहे. म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मंडळाकडून अंदाजे पाच हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात असून जाहिरात ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्याचे पुणे मंडळाचे नियोजन आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया किमान ४५ दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर सोडतीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे मंडळाला सोडतीचा निकाल जाहीर करणे शक्य होणार नाही. असे असले तरी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन नोव्हेंबरअखेरीस सोडतीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. मात्र अशी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सोडत डिसेंबरमध्येच काढण्यात येण्याची अधिक शक्यता आहे.

हेही वाचा – नागलाबंदर खाडी किनारा सुशोभिकरण कामाला महिनाभरात सुरुवात, दोन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण होणार

हेही वाचा – Video: “ओसामा बिन लादेन दहशतवादी म्हणून जन्मला नाही, त्याला समाजानं…”, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून अब्दुल कलाम आणि लादेन यांची तुलना

पुणे मंडळाच्या सुमारे पाच हजार घरांच्या सोडतीत पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथील घरांचा समावेश असणार आहे. ताथवडे, म्हाळुंगे येथील म्हाडाच्या विकल्या न जाणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेतील घरांचा सोडतीत समावेश असणार आहे. म्हाळुंगेमधील १३००, ताथवडेमधील ४१८ घरे प्रथम प्राधान्य योजनेतील असतील. तर २० टक्के योजनेतील सदनिकांची संख्या २,५०० ते ३,००० च्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्याचवळी पंतप्रधान आवास योजनेतील ३२० घरे कागलमधील असून तळेगावमधील पीएमएवाय योजनेतील १५० घरे सोडतीत समाविष्ट असणार आहेत. सोलापूरकरांसाठी सोडतीत १७० घरे असणार आहेत, तर संत तुकाराम नगरमधील ३२ आणि सासवडमधील ७९ घरांचाही सोडतीत समावेश असणार आहे. पुणे मंडळ विभागात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुकांनी आता कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात करावी असे आवाहन म्हाडा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.