Pune Porsche Crash Latest News: मागच्या महिन्यात २० मे च्या दिवशी पोर्श ही भरधाव कार अत्यंत वेगात चालवून दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन मुलाबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने मत व्यक्त केलं आहे. मागच्या महिन्यात पुण्यात ही घटना घडली. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं अश्विनी आणि अनिशच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने या मुलावर आघात झाला आहे, त्याला धक्का बसला आहे असं म्हटलं आहे.

नेमकी घटना काय घडली?

१७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला.

हे पण वाचा- Porsche Accident: “माझ्या मुलीच्या मृत्यूला १२ दिवस झाले आहेत, आता…”; अश्विनीच्या आईचा सून्न करणारा सवाल

मुंबई उच्च न्यायालयाने आता काय म्हटलंय?

ज्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दोघांना चिरडलं त्या अल्पवयीन मुलावरही आघात झाला आहे. त्याला थोडा वेळ द्यायची गरज आहे. भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणात हे मत मांडलं आहे. पुणे पोलिसांनी नेमकं काय केलं? या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर जामीन कसा काय मिळाला? याकडेही या न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं. तसंच त्या पुढे म्हणाल्या, “या मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आणि दोघांना चिरडलं. मात्र त्या मुलालाही या प्रसंगाचा धक्का बसला आहे. त्याला थोडा वेळ द्यायला हवा.” या मुलाच्या मावशीने एक याचिका दाखल केली आहे. या मुलाला रिमांड होममधून घरी सोडावं अशी मागणी यात करण्यात आली आहे. वकील अबाद पोंडा यांनी या मुलाच्या मावशीची बाजू काय आहे ती मांडली. यावेळी ते म्हणाले की या अल्पवयीन मुलाला आधी जामीन मिळाला आहे. मात्र आता त्याला रिमांड होममध्ये ठेवण्यात आलं आहे. हे एक प्रकारे त्याला बंदी बनवून ठेवण्यासारखंच आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळावा असं मुलाच्या मावशीच्या वकिलांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

सुरुवातीला मिळाला जामीन

ज्या मुलाने अपघात घडवला त्याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अपघात कसा घडला यावर ३०० शब्दांचा निबंध लिही हे सांगून जामीन मंजूर करण्यात आला होता. हा निर्णय समजल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजातून या मुलावर आणि ३०० शब्दांचा निबंध लिही सांगणाऱ्या न्यायाधीशांवर चांगलीच टीका झाली. तसंच गरीबाच्या मुलालाही इतकं सहज सोडलं गेलं असतं का? असे प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर या मुलाला सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. त्याची मुदत २५ जून आहे. त्याला सोडण्यात यावं या याचिकेसाठी जो युक्तिवाद झाला त्यात कोर्टाने हे मत मांडलं की त्या मुलावरही आघात झाला आहे.