Rahul Gandhi in Mumbai Live Updates Dharavi Redevelopment : मुंबईतील धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून चालू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने (ठाकरे) हा विषय लावून धरलेला असतानाच आता राहुल गांधी देखील यामध्ये सहभागी होत आहेत. आज (गुरुवार, ६ मार्च) ते मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत ते धारावीला भेट देतील आणि तिथल्या मजुरांशी, व्यावसायिकांशी संवाद साधतील. देशातील अनेक उद्योगधंद्यांची कंत्राटं अदाणी समूहाला देण्यात आली आहेत. अनेक उद्योग हे व्यावसायिक गौतम अदाणींच्या ताब्यात दिले आहेत. यावरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अदाणींच्या मार्फत केंद्र सरकार देशाची संपत्ती लुटत असल्याचा आरोप करत आहेत. अशातच धारावी पुनर्वसन प्रकल्पाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून आधीच राज्यातील महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
Rahul Gandhi in Mumbai Live Updates : राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
राहुल गांधींच्या स्वागताला वर्षा गायकवाड उपस्थित
राहुल गांधी महापालिकेचा आढावा घेणार
राहुल गांधी थोड्याच वेळात मुंबई काँग्रेसमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. आगामी महापालिका निवडणुकीचा आढावा घेतील. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत.
मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी अनेक मोठ्या नेत्यांची हजेरी
राहुल गांधी धारावीकरांना उद्दशून म्हणाले, "ही धारावी तुमची आहे. तुमचीच राहिली पाहिजे. तुमच्याकडे कौशल्य आहे. तुम्हाला केवळ थोडंसं सहाय्य हवं आहे. तुमच्यासाठी बँकांचे दरवाजे उघडले गेले पाहिजेत. धारावीत भारताचं उत्पादन केंद्र बनलं पाहिजे. धारावी हेच खरं मेक इन इंडिया आहे. मात्र, त्यांना (सरकारला) वाटतं की काही दलाल मिळून देश घडवतात. मात्र देश दलाल घडवत नाहीत. तुमच्यासारखे लोक देश घडवतात. माझा तुमच्यासाठी हा एकच संदेश आहे.
महापालिका निवडणुकीआधी पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीचं काम राहुल गांधी पाहतील. तसेच स्थानिक नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
राहुल गांधींचा दौरा काँग्रेससाठी महत्त्वाचा
राहुल गांधींचा हा दौरा महाराष्ट्र काँग्रेससाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुंबईत त्यांची उपस्थिती स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
मुंबईनंतर राहुल गांधी अहमदाबादला जाणार
मुंबईतील कार्यक्रम आटपून राहुल गांधी अहमदाबादला जाणार आहेत. तिथे ते पक्षबांधणीचं काम पाहणार. नेते, पदाधिकारी आणि मागी निवडणुकीतील उमेदवारांना भेटणार आहेत.