गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली. या पावसामुळे दहिसर नदीचं पाणी बोरीवली पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. ते देखील ओसरू लागलं आहे. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.
#WATCH | Maharashtra: Rainwater entered Mumbai’s Borivali east area following a heavy downpour this morning pic.twitter.com/7295IL0K5K
— ANI (@ANI) July 18, 2021
मुंबईच्या अनेक भागांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती रात्रभर दिसून आली.
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
विक्रोळीतही एक दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. सुरूवातीला तीन जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं म्हटलं होतं. यात आता पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी माहिती दिली आहे. पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, आणखी ५ ते ६ जण ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मुंबईच्या अनेक भागांमध्ये रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. रात्री ३.३० वाजेपर्यंत मुंबईच्या काही भागांमध्ये २०० मिमीहून जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
सांताक्रूज - २१७.५ मिमी
कुलाबा - १७८ मिमी
महालक्ष्मी - १५४.५ मिमी
वांद्रे - २०२ मिमी
जुहू विमानतळ - १९७.५ मिमी
राम मंदिर - १७१.५ मिमी
मीरा रोड - २०४ मिमी
दहिसर - २४९.५ मिमी
भायंदर - १७४.५ मिमी
मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, टीम येण्याआधी स्थानिकांनी २ मृतदेह बाहेर काढले होते, तर एनडीआरएफच्या टीमनं १० मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढले आहेत. तसेच, अजूनही ७ जण मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता एनडीआरएफच्या टीमकडून देण्यात आली आहे.
मुसळधार पावसानंतर मुंबईची लाईफलाईन लोकलची सेवा विस्कळीत
एकीकडे मुंबईच्या चेंबूर परिसरात दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना दुसरीकडे विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरात दुमजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एएनआयनं मुंबई महानगर पालिकेच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
मध्यरात्री १ वाजचा मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसानं हजेरी लावली.
पावसाचं पाणी साचल्यामुळे सायन परिसरात रस्त्यावर ज्या प्रकारे पाणी साचलं होतं, त्याच प्रकारे सायन रेल्वे स्थानक परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. त्यामुळे सायन रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून आलं.
मुंबईच्या सायन भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची दृश्य एएनआयनं दिली आहेत. हा संपूर्ण भाग खोलगट असल्यामुळे इथे दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याचं दिसून येतं. शनिवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सायन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे सायन परिसरात तलावसदृश्य स्थिती दिसून येत होती.
कांदिवली पूर्व भागामध्ये मुसळधार पावसानंतर घरांमध्ये मोठ्या प्रमाणारवर पाणी शिरलं. अनेक भागांमध्ये नागरिक घरातील भांड्यांच्या मदतीने पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.
मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे ११ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये घराची भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.