सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आलं असतं असं निरीक्षणही नोंदवण्यात आलं. यानंतर चर्चांना उधाण आलं. याबाबत पत्रकारांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणं टाळत मोजकी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१२ मे) ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “मी आधी तेच बोललो. उद्धव ठाकरेंचे काय प्रश्न आहेत याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं विचारलं म्हणून मी तेवढंच सांगितलं. मला उद्धव ठाकरेंविषयीचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे, माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न मला विचारून माझा वेळ वाया घालवू नका. परंतूला काहीही अर्थ नाही.”
“आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाही, म्हणून…”
“कुठल्याही मुख्यमंत्र्याने जपूनच राहिलं पाहिजे. आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाही. म्हणून आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. आपण कोणत्याही पदावर बसलेलो असलो तरी जपून राहिलं पाहिजे. प्रत्येकाला ते समजलं पाहिजे,” असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या जपून राहा या सल्ल्यावर पुन्हा एकदा भाष्य केलं.
“सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा”
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते.”
व्हिडीओ पाहा :
“चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाचं काय होणार?”
“त्यांनी सांगितलं सगळी प्रक्रिया चुकली, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार?” असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग काय करणार?”
“या सगळ्यात निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सर्वोच्च न्यायालय ही एक यंत्रणा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून मी हा निकाल प्रचंड गोंधळात टाकणारा आहे, असं म्हटलं. त्यामुळे ही सगळी धूळ खाली बसल्यावर आपल्या सर्वांना नक्की काय झालंय हे कळेल,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.