राज्यातील बहुतांश भागात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना अशा दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने आणलेली ‘जलयुक्त शिवार’ योजनाही कुचकामी ठरली आहे. कारण या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. याचाच तीव्र फटका दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना बसला आहे. या सर्व बाबींवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ताज्या व्यंगचित्राच्या माध्यमांतून राज्य सरकारचे वाभाडे काढले आहेत.


राज्यातील दुष्काळी स्थिती आणि जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारे ताजे व्यंगचित्र सोमवारी (दि.१५) राज ठाकरे यांनी प्रकाशित आहे. या चित्रातून त्यांनी सरकारी योजनेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवताना जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १ लाख २५ हजार खोट्या विहिरी बांधल्याचे दाखवण्यात आले आहे. या खोट्या गोष्टींचा फटका राज्यातील शेतकरी वर्गाला बसला असून राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे संतापलेल्या आणि तहानलेल्या महाराष्ट्रातून सरकारला शिव्यांची लाखोली वाहिली जात असल्याचे ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

राज यांच्या या व्यंगचित्रावर त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी राज्यातील ही सत्य परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज यांनी आपल्या कुंचल्यातून ही भयाण परिस्थीती योग्य प्रकारे मांडल्याने राज यांचे कौतुकही केले आहे. राज यांनी ट्विट केलेले हे व्यंगचित्र अनेकांनी रिट्विट केले असून त्याला शेकडो लाइक्स मिळाले असून त्यावर अनेक कमेंटही आल्या आहेत.