मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून आतपर्यंत साडेदहा हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण करून रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील एन १९ मधील ४०५३ झोपड्या रिकाम्या करून त्या हटविण्याच्या कामाला सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधील झोपु प्राधिकरणाकडून ४०५३ पैकी २५०० झोपड्या हटविण्यात आल्या असून उर्वरित दीड हजार झोपड्या लवकरच रिकाम्या करत पहिल्या टप्प्यातील संपूर्ण भूखंड मोकळा करुन हा भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हस्तांतरीत करण्याचे नियोजन झोपु प्राधिकरणाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वमूक्त मार्गाचा घाटकोपर ते ठाणे असा विस्तार एमएमआरडीएकडून केला जाणार आहे. या विस्तारीकरणात रमाबाईनगर, कामराजनगरमधील काही झोपड्या विस्थापित होणार होत्या. विस्थापित झोपड्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमएमआरडीएने घेतली आणि त्यानंतर राज्य सरकारने संयुक्त भागीदारी तत्वावर संपूर्ण रमाबाईनगर, कामराजनगरच्या १६ हजार ५७५ झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी एमएमआरडीएकडे दिली. त्यानुसार झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीएकडून संयुक्तरित्या हा प्रकल्प राबविला जात आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणावर बांधकामाच्या सर्वेक्षणाची, पात्रता निश्चितीची आणि झोपड्या रिकाम्या करुन मोकळा भूखंड एमएमआरडीएला वर्ग करण्याची कामे आहेत. त्यानुसार सध्या झोपु प्राधिकरणाकडून पात्रता निश्चिती आणि झोपड्या रिकाम्या करुन घेण्याचे काम वेगात सुरु असल्याची माहिती झोपुतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – आरोग्य विभागाच्या विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये २ लाख ७७ हजार बालकांवर उपचार

रमाबाईनगर, कामराजनगरमधील १६५७५ झोपड्यांपैकी केवळ १४४५४ झोपड्यांचाच प्रत्यक्षात पुनर्विकास होणार आहे. उर्वरित झोपड्या तांत्रिक कारणांमुळे वगळ्यात आल्या आहेत. त्यामुळे झोपुकडून १४५५४ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यातील १०५०० झोपड्या पात्र ठरल्या आहेत. एमएमआरडीएकडून दोन टप्प्यात पुनर्वसन प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील झोपड्या रिकाम्या करुन घेण्याची कामे सध्या झोपुकडून सुरु आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ४०५३ पैकी २८२७ झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. पात्र झोपडीधारकांपैकी २५०० हजार जणांच्या झोपड्या आतापर्यंत रिकाम्या करुन त्या हटविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

उर्वरित झोपडीधारकांची पात्रता निश्चिती सुरु आहे. ही पात्रता निश्चिती लवकरात लवकर पूर्ण करून पहिल्या टप्प्यातील झोपड्या हटवून भूखंड रिकामा करुन घेत तो एमएमआरडीएकडे वर्ग केला जाणार असल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले. दुसऱया टप्प्यातील झोपड्या रिकाम्या करुन घेण्याच्या प्रक्रियेला वेळ असल्याने पहिला टप्पा पूर्ण झाल्यास दुसऱ्या टप्प्यातील झोपड्या हटविण्याच्या कामास सुरुवात करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पाणी नाही नळाला ? महापालिका कशाला ? गोरेगाववासियांचा पाण्यासाठी जनप्रक्षोभ मोर्चा

पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी लवकरच एमएमआरडीएकडून निविदा

पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी झोपु प्राधिकरणाकडून ६ सप्टेंबर २०२४ रोजी एमएमआरडीएला आशय पत्र देण्यात आले आहे. या टप्प्यातील इमारत क्रमांक १ आणि २ साठी १३ डिसेंबर २०२४ रोजी झोपुकडून बांधकाम प्रस्ताव, नकाशे मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएकडून निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramabai ambedkar nagar redevelopment so far 2500 huts are vacant by zhupu authority mumbai print news ssb