Industrialist Ratan Tata Died at 86 : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी (९ ऑक्टोबर) मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी देखील रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार सुळे म्हणाल्या, “टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतीक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हे ही वाचा >> भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा काळाच्या पडद्याआड, अनेकांना समृद्ध करणाऱ्या खास माणसाची कारकीर्द कशी होती?

रतन टाटा यांचा परिचय

रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला. रतन टाटा यांनी १९६१ साली टाटा समूहाची प्रसिद्ध कंपनी टाटा स्टीलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ते १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीही मिळवली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून १९९१ हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे होते. देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर रतन टाटांच्या नेतृत्वाखाली या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली आहे.