मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंगमुळे जम्मू-काश्मीरमध्ये अस्थितरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. येथे हिंदू, काश्मिरी पंडितांच्या तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. असे असताना काश्मिरी पंडितांसाठी जे शक्य आहे ते करू अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तर दुसरीकडे रझा अकादमीदेखील काश्मिरी पंडितांच्या बाजूने उभी राहिली असून मुंबईतील मिनारा मशिदीसमोर अकादमीतर्फे निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा >> उत्तर प्रदेश रासायनिक कारखाना स्फोट : मृतांचा आकडा १२ वर, चौकशीसाठी समितीची स्थापना

रझा अकादमीने काल (४ जून रोजी) जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जचा निषेध केला आहे. अकादमीने काश्मिरी पंडितांना पांठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मिनारा मशिदीसमोर निदर्शने केली. यावेळी रझा अकादमीचे कार्यकर्ते तसेच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निदर्शकांच्या हातामध्ये काश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबवा,” अशा आशयाचे फलक होते. “काश्मीरमध्ये जो अत्याचार सुरु आहे, तो थांबला पाहिजे. अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करायला हवी,” अशी मागणी यावेळी रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नुरी यांनी केली.

हेही वाचा >> मोठी बातमी! कोर्बेव्हॅक्स लसीला DCGIकडून हिरवा झेंडा, बुस्टर डोस म्हणून वापर करण्यास परवानगी

दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्यासत्राचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. हा अन्याय थांबवण्यात यावा अशी प्रतिक्रिया नेतेमंडळींकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील ही हिंसा थावण्यात यावी. काश्मिरी पंडितांची शक्य होईल तेवढी मदत करु, असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा >> बॉडी स्प्रेच्या जाहिरातीत सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली मोठी कारवाई

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला. महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.