लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुलींवरील अत्याचारांच्या घटना समोर येत असताना राज्यातील लाखो तरुणींनी पोलीस दलात भरतीसाठी चाचणी दिली आहे. खाकी वर्दीचे स्वप्न घेऊन तरुणी शहरात आल्या आहेत. भर पावसात पदपथ, रेल्वे फलाट, उड्डाणपुलांच्या खाली त्यांना आसरा घ्यावा लागला. स्वच्छतागृहांच्या कमतरतेसह अनेक गैरसोयी असतानाही त्या आपले स्पप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत.

पोलीस दलातील १७ हजार ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यातील ३ हजार ९२४ पदे महिलांसाठी आहेत. त्यासाठी दोन लाख ७८ हजार ८२९ अर्ज आले आहेत. मुंबईत १ हजार २५७ पदांसाठी मैदानी परीक्षा नुकतीच झाली. त्यासाठी सर्वाधिक, सुमारे एक लाख १० हजार तरुणींनी अर्ज केले होते. इतर जिल्ह्यांतून आलेल्या महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक दिवस मरिन लाइन्सच्या परिसरात मुक्काम केला होता. सर्व अडचणींवर मात करून त्या खडतर चाचणीला सामोऱ्या गेल्या. लहानपणापासूनच पोलीस व्हायचे होते. महिलांवरील अत्याचारांना एक महिला म्हणून न्याय देऊ शकेन, असे वाटते. कुटुंबीयांचीही साथ आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी चाचणी दिली, असे श्रावणी येनपुरे यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्या सुविधा देण्यात आल्याचे बँड्समन म्हणून भरतीसाठी आलेल्या अंकिता गुरव म्हणाल्या. बाहेरून मुंबईत येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था मात्र होत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. स्वच्छतागृहांची कमतरता, विश्रांतीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे निरोगी, सुदृढ महिला उमेदवारांच्याही शारीरिक चाचणीवर परिणाम होते. कधी वजन जास्त भरते, धावताना त्रास होतो. त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्यांकरिता किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड

महिलांपुढे अनेक आव्हाने

बाहेरच्या जिल्ह्यातून मुंबई, पुण्यातील भरतीसाठी येणाऱ्यांची योग्य ती व्यवस्था करणे आवश्यक आहे. अनेक तरुण-तरुणी पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या असतात. इथले वातावरण व लोकलचा प्रवास याच्याशी जुळवून घेणे त्यांना कठीण जाते. स्वच्छतागृहांचा प्रश्न फार गंभीर आहे. मुंबईत हॉटेलमध्ये राहणे अनेकींना शक्य होत नाही. पण पोलिसांनी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तंबू बांधून त्यांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणारे निवृत्त लष्करी अधिकारी अनिल माने यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment process for 17 thousand 471 posts in police force started amy