मुंबई : परराज्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांचा राज्यातील शासकीय व शासकीय अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परराज्यातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अखिल भारतीय कोट्याबरोबरच राज्य कोट्यातून प्रवेश मिळणार आहे.

आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय आणि राज्य कोट्यातून प्रवेश दिले जातात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय व शासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के, तर खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यांतर्गत ७० टक्के जागा राखीव असतात. या कोट्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. तर उर्वरित १५ व ३० टक्के जागांवर परराज्यातील विद्यार्थ्यांना अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश दिला जातो.

महाराष्ट्रातील अधिवास असलेला, परंतु परराज्यातून आयुर्वेद पदवी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी राज्य कोट्यातून प्रवेशासाठी पात्र ठरत नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय कोट्यातून महाराष्ट्रातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागत होता. मात्र महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश देण्यासंदर्भातील निर्णय वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश नियमावलीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे परराज्यातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – मुंबई : टाटा रुग्णालयातील प्रोटॉन उपचार पद्धती रुग्णांसाठी वरदान

हेही वाचा – मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू


प्रवेशासाठी निकष

● अन्य राज्यांतील मान्यताप्राप्त संस्थेतून आयुर्वेद पदवी उत्तीर्ण केलेले आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या उमेदवारांना राज्याचे निवासी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

● त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याबाहेरील आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना संबंधित आयुर्वेद महाविद्यालयातील अधिष्ठात्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

● विद्यार्थ्याने अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२४ मध्ये किमान ५० वा पर्सेंटाइल मिळवलेले असावे. तर दिव्यांग व्यक्तीने अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२४ मध्ये ४५ पर्सेंटाइलपेक्षा कमी गुण मिळवलेले नसावेत.

● महाराष्ट्र आयुर्वेद व्यवसायी कायदा, १९६१ आणि महाराष्ट्रातील महाविद्यालयातून पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे.