मुंबई : ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर आणि चित्रपटाचे निर्माते नरेंद्र आणि श्रेयांश हिरावत यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून दिलासा दिला. पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच तीन आठवडय़ांपर्यंत या तिघांवर कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने या वेळी माहीम पोलिसांना दिले. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळण्यात आले आहे आणि समाजमाध्यमावरूनही चित्रपटाची आक्षेपार्ह जाहिरात काढून टाकण्यात आली आहे. शिवाय मांजरेकर आणि हिरावत हे तपासात सहकार्य करण्यासाठी आणि आवश्यक असेल त्या वेळी पोलिसांसमोर हजर राहून चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याची माहिती त्यांचे वकील शिरीष गुप्ते व आबाद पोंडा यांनी दिली. तर कठोर कारवाईपूर्वी मांजरेकर आणि अन्य दोघांना ७२ तासांची नोटीस दिली जाईल, असे सरकारी वकील माधवी म्हात्रे यांनी सांगितले. त्यावर सेन्सॉर बोर्डाच्या आवश्यक त्या प्रमाणपत्रासह चित्रपट प्रदर्शित झालेला आहे हे तक्रारदार सीमा देशपांडे यांनी केलेल्या वक्तव्याची न्यायालयाने नोंद घेतली. मांजरेकर आणि चित्रपटांचे निर्माते तपासात सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे नोंदवून तिघेही अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी पात्र आहेत, असे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे माहीम पोलिसांनी पुढील तीन आठवडय़ांपर्यंत मांजरेकर आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात अटकेसारखी कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. त्याच वेळी न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.