कर्जत-जामखेड एमआयडीसीचा प्रश्न विधानपरिषेदत उपस्थित करण्यात आला. तेव्हा आमदार राम शिंदे आणि अन्य आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी आमदार सचिन अहिर यांनी टोलेबाजी केली आहे. रोहित पवारांनी एमआयडीसीसाठी केलेल्या आंदोलनानंतर दोन मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं. राम शिंदेंनीही वारंवार एमआयडीसीची मागणी केली आहे. ही फाइल सहीसाठी मंत्र्यांच्या टेबलवर आहे. मात्र, सही होणारी फाईल कोणती आहे, हे आम्हाला समजलं नाही, असा टोला सचिन अहीर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.
सचिन अहिर म्हणाले, “कर्जतमध्ये एमआयडीसीची गरज आहे का? हे पाहिलं पाहिजे. आजुबाजूचं उदाहरण द्यायचं झालं, तर पेप्सी कंपनीने दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पेप्सी कंपनीने २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक सुप्यात केली. पोषक वातावरण आणि आवश्यक त्या गोष्टी मिळाल्यामुळे एखादी कंपनी गुंतवणूक करत असते.”
“एमआयडीसीसाठी पाणी महत्वाचं आहे. तळोजातील एमआयडीसी येथे दीपक फर्टीलायझर या कंपनीचा विस्तार झाला. पण, पाणी नसल्याने त्यांचं काम बंद आहे. पैठणमधील एमआयडीसीमध्ये व्यवसायांना बोलवण्यात येत. मात्र, तेथील एकाही जमिनीची विक्री होत नाही. कारण, तेथील जमिनीचा भाव खूप आहे. पैठणमध्ये एखाद्या कपलला फिरायला जायचं, तर तो तिकडे कारमधून फेऱ्या मारतो. अशी अत्यावस्था एमआयडीसीची झाली आहे,” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.
तेव्हा नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “प्रश्न घ्या…”
“अशी कोणती फाइल उद्योगमंत्र्याकडे आहे की, ज्यावर सही केली जात नाही. जर फाइलवर सही झाली असेल, तर कंपन्यांना एमआयडीसीमध्ये बोलवा. कंपन्यांना कमी रुपयांना जमीन देण्याचं आश्वासन द्या. त्यामुळे कर्जत आणि जामखेडमध्ये कंपन्या येतील,” असेही सचिन यांनी म्हटलं.