नागपूर ते मुंबई हा दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा समृद्धी महामार्गातील अनेक अडथळ्यानंतर अखेर याचे भूमिपूजनचा मुहूर्त ठरला आहे. पुढील आठवड्यात १८ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, ते मुंबई मेट्रोच्या कामांचं भूमिपूजनही करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जाणारा समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम जवळपास ९० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र, सरकारला यासाठी शेतकऱ्यांचा मोठा रोष पतकारावा लागला होता. अद्यापही १० टक्के शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी राज्य शासन लवकरच समद्धी महामार्गाच्या कामाला सुरवात करणार आहे. त्यासाठी येत्या १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महामार्ग उभारण्यासाठी लागणारे गौण खनिज मुरूम, दगड, माती सहज उपलब्ध व्हावी तसेच शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळावा, यासाठी ठेकेदार शेतकऱ्यांना मोफत शेततळे तयार करून देणार आणि यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोठ्या फायदा होणार आहे. राज्य शासनाने यासाठी नुकतेच परिपत्रक काढले आहे.
फडणवीस सरकारचा चार वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन निवडणुकीचे वेध लागले तरीही सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या समृद्धी महामार्गाकरिता भूसंपादन अद्यापही पूर्ण झालेले नाही. महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध होता. राजकीय पक्षांनी आपली पोळी यात भाजून घेण्याचा प्रयत्न केला. भूसंपादन लवकर मार्गी लागावे म्हणून सरकारने जमिनीचा भाव वाढवून दिला. महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे. या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप झाले होते.