शिवसेनेचे खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी मुंबईतील वज्रमुठ सभेवर टीका करणाऱ्या मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर सडकून टीका केली आहे. “आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, तुझे डोळे चिनी आहेत चिनी,” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपा नेते आशिष शेलारांवर शाब्दिक हल्ला चढवला. ते सोमवारी (१ मे) मुंबईत बीकेसी मैदानावर आयोजित वज्रमुठ सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी ही वज्रमुठ सभा आहे. सभा प्रचंड आहे. जेवढी सभा इथं गच्च भरली आहे, त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट लोक संपूर्ण बीकेसीच्या अवतीभोवती उभे आहेत. आज सकाळीच मी ऐकत होतो. भाजपाचे मुंबईतील एक नेते सांगत होते की, मुंबईतील सर्वात लहान मैदानावर ही सर्वात लहान वज्रमुठ सभा होते आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, तुझे डोळे चिनी आहेत चिनी. त्यांचे डोळे असे बारीक आहेत.”

“अमित शाहा बहुतेक वज्रमुठ सभा पाहायला सभेत येऊन बसले असतील”

“अरे येऊन पाहा ही काय ताकद आहे. या सभेने एक निकाल दिला आहे. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाची, मुंबई आमच्या बापाची. काल देशाचे गृहमंत्री मुंबईत आले होते. आत्ता आहेत की नाहीत, मला माहिती नाही. बहुतेक वज्रमुठ सभा पाहायला सभेत येऊन बसले असतील. त्यांनी ही ताकद पाहावी. ही निष्ठा पाहावी आणि आमची वज्रमुठही पाहावी,” असं आव्हान संजय राऊतांनी दिलं.

हेही वाचा : “मूठभर मैदान आणि…”, मविआच्या वज्रमूठ सभेवरून आशिष शेलारांचा टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख!

व्हिडीओ पाहा :

“देशाचा एकमेव पंतप्रधान पाहिला जो ९ वर्षे फक्त मन की बात करत आहे”

संजय राऊत पुढे म्हणाले, “या देशात काल आणखी एक इव्हेंट झाला. तो म्हणजे मन की बात. मन की बात काय असतं, तर अभिनेत्री माधुरी दिक्षित कुठंतरी गर्दीत ऐकते आहे. मी या देशाचा एकमेव पंतप्रधान पाहिला जो ९ वर्षे फक्त मन की बात करत आहे, काम की बात करत नाही. अरे काम की बात करा, जनतेची बात करा. महाराष्ट्राची ही वज्रमुठ सभा यापुढे केवळ काम की बात करेल.”

“महाराष्ट्राचे लचके तोडण्याचं कारस्थान सुरू”

“आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. पुन्हा एकदा दिल्लीच्या पातळीवर महाराष्ट्राचे लचके तोडण्याचं कारस्थान सुरू झालं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, कमजोर करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. त्यासाठीच शिवसेनेवर हल्ला केला गेला, घाव घातला. जोपर्यंत या महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे तोपर्यंत आपल्याला या महाराष्ट्राचा लचका तोडता येणार नाही ही भीती दिल्लीश्वरांना होती. म्हणून त्यांनी शिवसेनेचा लचकातोड करण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींनी आमच्या ‘मन की बात’ ऐकावी”, भारताला पदक मिळवून देणाऱ्या ‘दंगल गर्ल’चं विधान

“शिवसेना मुंबई-महाराष्ट्रात पाय रोऊन उभी राहील”

“असं असलं तरी त्यांनी कितीही लांडगेतोड केली, तरी ही शिवसेना मुंबई-महाराष्ट्रात पाय रोऊन उभी राहील आणि त्यांचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. कारण आता शिवसेनेबरोबर आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मुस्लीम समाज, दलित बांधव आहेत,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize bjp leader over remark on vajramuth sabha in mumbai pbs
Show comments