शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच बारसूच्या माळरानावर जमलेल्या आंदोलकांना तुमच्यावर गोळ्या झाडू, अशा धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप केला. यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारसूत जाऊन तेथील नागरिकांवर रोखलेल्या बंदुका पाहाव्यात, असंही म्हटलं. ते मंगळवारी (२५ एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “लोकांचा विरोध आहे. कालपासून ५-६ हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही गोळ्या खाऊ, मरू, पण येथून हटणार नाही, असं ते म्हणत आहेत. या राज्याचे उद्योगमंत्री पोलिसांना हाताशी धरून बारसूच्या आंदोलकांना तुमच्यावर गोळ्या झाडू अशा धमक्या देत आहेत. मात्र, स्थानिकांचा जमीन अधिग्रहणाला विरोध आहे. अनेक कुटुंबं परागंदा झाली आहेत. अनेकांना पोलीस स्टेशनला बोलावून २४-२४ तास बसवून ठेऊन धमक्या दिल्या जात आहेत.”

“हजारो लोकांना तडीपारीच्या नोटीस, धमक्या, अटक”

“बारसू, राजापूर आणि आसपासच्या भागात हजारो लोकांना तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. इतकं नव्हे, तर पोलीस लाथा मारून प्रकल्पाला विरोध असणाऱ्या आणि मुंबईत राहणाऱ्या बारसूच्या नागरिकांच्या घरात घुसत आहेत. त्यांना धमक्या देत आहेत.मुंबईतील बारसूच्या रहिवाशांनाही अटक केली जात आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

हेही वाचा : “राजकारणात पुतण्यांनी घोटाळा करून ठेवलाय”, म्हणून अजित पवारांना आव्हान? राऊतांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया, म्हणाले…

“तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील”

संजय राऊत पुढे म्हणाले, “हे अत्यंत विकृत, दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूच्या माळरानावरील हजारो लोक मागे हटले नाहीत, तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील. तसेच जालीयनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल की काय अशी मला भीती वाटते आहे. म्हणून उद्धव ठाकरे या प्रकरणात लक्ष घालत आहेत. कदाचित मुंबईला त्यात लक्ष घालावं लागेल आणि आम्हाला तिकडे जावं लागेल. आम्ही जनतेबरोबर आहोत. जनतेने विरोध केला आहे. जनता छातीवर गोळ्या झेलायला तयार आहे. जनता तुरुंगात जायला तयार आहे. अशावेळी शिवसेना स्वस्थ बसणार नाही.”

“आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं, कारण…”

“याच प्रकरणात शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. तो मृत्यू नसून रिफायनरी प्रकरणात झालेली हत्या आहे. आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं. कारण त्या भागात महाराष्ट्राबाहेरील अनेक परप्रांतियांना जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनीचं मोल कमी होईल. त्यांची गुंतवणूक अडचणीत येईल म्हणून धाकधपटशा करून ती रिफायनरी करण्याचं सरकारचं धोरण आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

“तेच हेलिकॉप्टर घेऊन एकनाथ शिंदेंनी बारसूला जावं”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात. ते हेलिकॉप्टर घेऊन तीन दिवस सुट्टीवर गेलेत. त्यांच्या घराजवळ हेलिपॅड आहे. त्यांनी तेच हेलिकॉप्टर घेऊन बारसूला जावं आणि ७२ तासांपासून बसलेल्या आंदोलकांची अवस्था काय आहे पाहावी. पोलिसांनी कशा बंदुका रोखल्या आहेत, धमक्या देत आहेत हे समजून घ्यावं. देवेंद्र फडणवीसांच्या ह्रदयात थोडी जरी मानवतेची ज्योत असेल तर त्यांनीही जावं आणि काय अवस्था आहे हे पाहावं,” असंही राऊतांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut express fear of mass murder amid barsu rajapur protest against refinery pbs
Show comments