Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला. ही घटना २६ ऑगस्टला घडली. यावरुन सुरु झालेलं राजकारण अद्याप थांबलेलं नाही. महाविकास आघाडीने १ सप्टेंबरला या घटनेविरोधात जोडे मारो आंदोलनही केलं. हा वाद शमतो न शमतो तोच आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपा आणि अदाणींवर मुंबई विमानतळावरचा शिवरायांचा पुतळा अडगळीत टाकल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी अजित पवारांवरही जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांबाबत काय म्हणाले संजय राऊत?

अजित पवारांनी रडीच्या डावाच्या गोष्टी करु नये. ज्यांनी काकांचा पक्ष आणि चिन्ह कर्तृत्व नसताना पळवून नेतात त्यांनी या गोष्टी करु नये. अजित पवारांमध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात. चोऱ्यामाऱ्या करुन जे राजकारणात आहेत त्यांच्या तोंडी मर्दानगीची भाषा शोभत नाही असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी अजित पवारांना टोला लगावला.

हे पण वाचा- Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

मुंबई विमानतळ अदाणींच्या ताब्यात गेल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा काढला

“मुंबई विमानतळ हे गौतम अदाणींच्या म्हणजे भाजपाच्या ताब्यात गेल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा नाही. जवळजवळ पुतळा गोडाऊनमध्ये टाकण्यात आला आहे. त्या पुतळ्याचा जिरेटोप तुटला आहे. यावर भाजपाचे नेते, तथाकथित स्वतःला हिंदूंचे कैवारी समजणारे नेते, बोगस शिवभक्त, भाजपा आणि शिंदे गटातले यांचं काय म्हणणं आहे? मुंबईत म्हणजेच महाराष्ट्राच्या राजधानीत शिवपुतळ्याची अशा प्रकारे विटंबना भाजपाच्या लाडक्या उद्योगपती आणि कंत्राटदारांकडून होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब आहे. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहे. भाजपा आणि शिंदे गटाचं नाही. शिवरायांनी जो स्वाभिमान आम्हाला शिकवला तो या लोकांकडे गुंजभरही उरलेला नाही. लाडक्या उद्योगपतींनी छत्रपती शिवरायांचा जो अपमान केला आहे ते हे लोक उघड्या डोळ्याने पाहात आहेत. आमचे लोक जेव्हा शिवपुतळा सोडवण्यासाठी गेले तेव्हा गौतम अदाणींचे २०० बाऊन्सर अंगावर धावून आले. गृहमंत्र्यांना हे माहीत आहे का? शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुटका आमच्या शिवसैनिकांना करायची होती. त्यामुळे ते अंगावर धावून गेले” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

छत्रपती शिवरायांचा विमानतळावर असलेला पुतळा भाजपा आणि अदाणींच्या लोकांनी अडगळीत टाकल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. (फोटो-फेसबुक)

भाजपाला शिवरायांबाबत श्रद्धा नाही

संजय राऊत म्हणाले, “यांचे लोक बाहेर जाऊन मोठमोठी भाषणं देत आहेत, त्यांची महाराष्ट्राला लाज वाटली पाहिजे. आमच्याच कालखंडात मुंबई विमानतळावर भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र आजच्या सरकारला शिवाजी महाराजांबाबत प्रेम नाही, श्रद्धा नाही. कदाचित ते यापुढे शिवाजी महाराजांच्या तसबिरी काढून आपल्या कार्यालयात आणि घरात अदाणींच्या तसबिरी लावतील अशी यांची अवस्था आहे.” असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

शिवरायांचा अपमान करणारे सगळे लोक भाजपात

यांचे राज्यपाल कोश्यारी, प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्येकाने शिवरायांचा अपमान केला. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपात आहे हे लक्षात घ्या. यावरुन यांचं छत्रपतींवरचं प्रेम किती आहे ते तुम्ही पाहा. मालवण पुतळ्या संदर्भात अद्यापही मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. शिल्पकार वर्षा बंगल्यावर तर लपलेले नाहीत ना? किंवा चिल्ल्या पिल्ल्यांनी तर त्यांना लपवलं नाही ना? अशी लोकांना शंका येते आहे असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांच्या आरोपावर विमानतळ प्रशासनाकडून स्पष्टीकरण

दरम्यान, संजय राऊतांच्या या आरोपानंतर मुंबईत विमानतळ प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मुंबई विमानतळ येथे सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे योग्य आणि पूर्ण संरक्षण करण्यासाठी, पुतळा तात्पुरता झाकण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेले विमानतळ म्हणून अभिमानाने आम्ही ही खबरदारी घेतली आहे. राजकीय लाभासाठी काही नेते आरोप करत आहेत. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut serious allegation on bjp and adani group about shivaji maharaj statue at mumbai airport scj