मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील परिवहन विभागातील एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे. परराज्यातून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन अंधेरी आरटीओत १०० हून अधिक बस आणि अन्य वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच यापैकी बहुतांश वाहनांची मूळ कागदपत्रे गहाळ झाली असून वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘वाहन’ या संगणकीय यंत्रणेवरसुद्धा ती उपलब्ध नाहीत, असे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी वाशी आरटीओने काही बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेली पाच-सहा बस पकडून सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वसई आरटीओमध्ये परराज्यातून आलेल्या सुमारे ६० बस आणि ट्रक यांची बोगस नोंदणी झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून त्याबाबत काही ठोस कारवाई होण्याआधीच अंधेरी आरटीओमधील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित

‘अंधेरी आरटीओ’त परराज्यातून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आलेल्या जवळपास १२५ बस आणि ट्रकची नोंदणी झाल्याचे बोलले जाते. या वाहनांची महाराष्ट्रातील इतर आरटीओमध्येही नोंदणी केल्याचे समजते.

आरटीओतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी आरटीओतील काम करणाऱ्या कारकुनाला आरटीओ अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. यापैकी एका कारकुनाने ८० हून अधिक बसची नोंदणी बनावट पद्धतीने केली असल्याचे आरटीओ प्रशासनाच्या तपासात उघडकीस आल्याचे समजते.

गेली अनेक वर्षे अंधेरी आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पद रिक्त असून येथे केवळ पल्लवी कोठावदे या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यरत आहेत. मात्र बोरिवलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्याकडे अंधेरीतील रिक्त पदाचा अतिरिक्त भार आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत मी बोलणे योग्य नसून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्याशी बोलावे, असे पल्लवी कोठावदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हेही वाचा – मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

तर, अशोक पवार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र अतिरिक्त परिवहन आयुक्त जे. बी. पाटील यांनी ४ कारकुनांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे मान्य केले. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगतानाच इतर तपशील उघड करण्यास नकार दिला.

लिलाव, भंगारातील वाहने

बँकांनी लिलावात काढलेली, भंगारातील आणि आयुर्मान संपत आलेली वाहने एका टोळीकडून खरेदी केली जातात. ती बनावट कागदपत्रांच्या आधारे परराज्यात नोंदणी करतात. त्यानंतर पुन्हा ही वाहने महाराष्ट्रात आणून त्यांची पुन्हा नोंदणी केली जाते. प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश, नागालँड, तेलंगणा, मणिपूर या राज्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून, या जुन्या वाहनांचे उत्पादन वर्ष बदलून, चेसिस आणि इंजिन क्रमांक बदलून अनेक वाहनांची पुनर्नोंदणी राज्यातील आरटीओमध्ये होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scam in transport department registration of more than 100 vehicles based on fake documents in andheri rto mumbai print news ssb
Show comments