मुंबई : भाजपचा ब संघ म्हणून शिक्का बसलेल्या व आयातांना उमेदवारी देत निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितचे महाविकास आघाडीबरोबर सूर जुळण्याची शक्यता नाही, असे गृहीत धरून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करण्याचे वंचितने ठरवलेले आहे.

लोणावळा येथे १३ व १४ जून रोजी वंचितच्या राज्य कार्यकारिणीचे चिंतन शिबीर झाले. राज्यात दोन्ही आघाड्या आहेत, त्यामुळे आपण स्वतंत्रपणे न लढता आघाडीतच लढले पाहिजे, असे काही सदस्यांनी शिबिरात सुचवले. ज्यांना प्रस्थापित पक्षांकडून उमेदवारी नाकारली जाते, त्यांना आपण उमेदवारी देतो, त्यामुळे पक्ष संघटनेला मर्यादा पडल्याचा मुद्दा या वेळी अनेकांना मांडला. आम्ही आघाडीत लढण्याची मानसिकता केली होती, अचानक स्वतंत्रपणे लढण्याची वेळ ओढवली. त्यामुळे तयारी कमी पडल्याचे अनेकांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई : खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पालिकेची कारवाई मोहीम, मंगळवार रात्रीपासून सुरुवात

लोकसभा निवडणुकीचा कल पाहता आपण महाविकास आघाडीबरोबर विधानसभेला जाण्याची शक्यता कमी असल्याने स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आघाड्यांचे राजकारण जरी यशस्वी ठरत असले तरी तिसऱ्या आघाडीचा पर्याय तितकाच महत्त्वाचा आहे. आपला मतदार सोडून गेलेला नाही याकडे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले.