राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आणि हिंसाचार करू नये, असं आवाहन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आंदोलनाला गालबोट लागेल असं वर्तन करू नये, असं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री शंभुराज देसाई यांनी या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंभुराज देसाई म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवणं हा एकमेव पर्याय दिसतो आहे. या सर्व गोष्टींवर महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव व भगिनींनी थोडंसं गांभीर्यपूर्वक बघितलं पाहिजे. काही ठिकाणी आमदारांची घरं जाळली. आमचे विधीमंडळातील एक सहकारी आमदार त्यांच्या पत्नी माध्यमांसमोर सांगत होत्या की, त्यांची मुलं भेदरलेल्या अवस्थेत कशी घरात बसली होती.”

“आरक्षण द्यायचं नाही असं आमच्यापैकी एकही आमदार म्हटला का?”

“आम्ही आमदारही जनतेचेच प्रतिनिधी आहोत. आम्ही सर्वधर्मीय, सर्वजातीय ३-४ लाख लोकांचे प्रतिनिधी आहोत. आरक्षण द्यायचं नाही असं आमच्यापैकी एकही आमदार कधी म्हटला आहे का? सर्व आमदारांचं म्हणणं आहे की, कायद्याच्या चौकटीत बसणारं, नियमात टिकणारं आणि तहहयात शिक्कामोर्तब होईल असं आरक्षण द्यायचं आहे. त्याच मताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत,” असं मत शंभुराज देसाई यांनी व्यक्त केलं.

“शिंदेंनी बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह सर्वांना बोलावलं”

शंभुराज देसाई पुढे म्हणाले, “यासाठीच एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवारांना बोलावलं आहे, उद्धव ठाकरेंना बोलावलं आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले अशा सर्व प्रमुख लोकांना बैठकीला बोलावलं आहे. आता महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र विचार विनिमय केला पाहिजे.”

हेही वाचा : मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आंदोलनाला गालबोट…”

“सरकारची अजिबात आडमुठी भूमिका नाही”

“एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी पुढाकार घेतला आहे. आज (१ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता ती बैठक होत आहे.त्या बैठकीत सर्वांशी चर्चा केली जाईल. सरकारची अजिबात आडमुठी भूमिका नाही. सरकार सर्वांचे विचार ऐकून घेईल. तसेच आज जे ठरले त्यासाठी सरकार सकारात्मकपणे पावलं उचलेल,” असंही शंभुराज देसाई यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai comment on violence in maharashtra over maratha reservation pbs
Show comments