मुंबई : गाण्याच्या माध्यमातून लोकांना वैचारिक दिशा देण्याचे कार्य शाहिर साबळे यांनी आयुष्यभर केले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात त्यांचे अढळ स्थान आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याची नव्याने निर्मिती करण्यात असून त्याच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
शाहीर साबळे यांनी गायलेले जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. एका दृष्टीने हा शाहिरांचा गौरवच आहे अशा शब्दांत पवार यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केदार शिंदे यांनी मराठीतील १८ कलाकारांचा सहभाग असलेल्या या गाण्याची निर्मिती केली आहे. ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी माझा थेट संबंध आला नाही, त्या चळवळीच्या कालखंडात मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. पण त्या वेळी शाहिरांच्या गाण्याने आम्ही भारावून जात असू,’ अशी आठवणही पवार यांनी यावेळी सांगितली.
भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा..
जय जय महाराष्ट्र माझा या गीतातील भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा.. या ओळीचा संदर्भ देऊन पवार म्हणाले, शाहिरांच्या आवाजातील ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्यातील एक ओळ मला आकर्षित करते. ‘या गाण्यात भीमथडीचे तट्ट असा उल्लेख आहे. या शब्दाचा अर्थ असा की भीमा नदीच्या काठावर एक गाव होते आणि १९४७ पूर्वी त्या गावाचे नाव ‘भीमथडी’ होते. १९४७ नंतर त्या गावाचे नाव बदलले आणि ते ‘बारामती’ झाले.