राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आता शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. पुढे बोलताना, या प्रकरणाची केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींच्या हत्येवर आदित्य ठाकरेंची पोस्ट; म्हणाले…

बाबा सिद्दीकींची हत्या नेमकी कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं?याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही कुणालाही…”

कोण होते बाबा बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ व २००९ मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली होती. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो, की विशेष चर्चा असा मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिश्यान सिद्दीकी याला मतदंरसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत.