महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांची आज (२ एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची सार्वजनिक सभा होतेय. त्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी या सभेला किती गर्दी होणार असा प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारला. त्यावर शर्मिला ठाकरे यांनी आम्हाला सभेच्या गर्दीची काळजी नाही. राज ठाकरे यांची सभा कायम रेकॉर्ड ब्रेक होत आली आहे, असं थेट उत्तर दिलं. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “राज ठाकरे यांची सभा कायमच रेकॉर्ड ब्रेक होत आली आहे. मी आतापर्यंत कधीच बघितलं नाही की आम्हाला गर्दीची काळजी आहे. उलट करोना काळात बघितलं तर त्यांनी जिथं जिथं शाखा उद्घाटन केलं तेथे निर्बंध असूनही धक्काबुक्की होईल अशी गर्दी होती. त्यामुळे सभेला गर्दीची आम्हाला काळजी नाही.”

“मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ले देत नाही”

“मी कधीच राज ठाकरे यांना काहीच सल्ले देत नाही. माझ्यापेक्षा राजकारणातील त्यांनी खूप कळतं. त्यांना लोकांचे प्रश्न जास्त माहिती असतात. त्यामुळे ते सर्वांबद्दल काहीतरी बोलतील. अमितला देखील मी आई म्हणून सल्ले देत नाही. माझ्यापेक्षा त्यांना राजकारणातील जास्त कळतं. अमितचे वडील म्हणून राज ठाकरे त्याला सूचना देतील,” असंही शर्मिला ठाकरेंनी नमूद केलं.

“शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होऊ दे”

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आज आनंद असा आहे की आज महाराष्ट्रावरील करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. करोनामुक्त महाराष्ट्र झालाय असं म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचं आयुष्य रोगराईमुक्त जावो. एसटी कर्मचाऱ्यांचा संप बंद होऊन त्यांना सगळ्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळू दे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होऊ दे. त्यांना वीज मोफत मिळू दे. सगळ्यांना ‘जो जे वांछिल तो तेलावो’ अशी मी प्रार्थना करते.”

हेही वाचा : राज ठाकरे सभेत काय बोलतील, तुमच्या अपेक्षा काय? शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मी कधीच राज ठाकरे यांना…”

“मी माझ्या मुलांच्या आधी पोलिसांना गोड दिलंय”

“मागील २ वर्षे महाराष्ट्रानेच नाही तर जगाने फार हालाखित काढले आहेत. तसे दिवस परत येऊ नये. आज आम्हाला आमचे सर्व सैनिक भेटत आहेत याचा आनंद आहे. आम्ही २ वर्षांनी भेटतो आहोत. त्यामुळे आणखी उत्साह आहे. मी दरवर्षी पेढे आणि बर्फी वाटते. मला वाटतं आपण गोड खाऊन आपला दिवस गोड करतो, पण पोलिसांसह हे लोक दिवसभर ८ ते १६ तास त्यांच्या ड्युटी सुरू राहतात. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा गोड दिलं पाहिजे. मी माझ्या मुलांच्या आधी पोलिसांना गोड दिलंय,” असं शर्मिला ठाकरे यांनी नमूद केलं.