मुंबई : मनावर दगड ठेवून भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, अशी कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. पाटील यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. पनवेल येथे शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील अनेक नेते बैठकीस उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 भाजप व शिवसेना युतीला २०१९ मधील निवडणुकीत बहुमत मिळूनही शिवसेनेने विश्वासघात करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, असे सांगून पाटील म्हणाले, करोनाकाळात जनतेचे खूप हाल झाले. सरकारविरोधात कोणी टिप्पणी केल्यास तुरूंगात डांबले गेले. राज्याची विकासगती मंदावली. गेल्या अडीच वर्षांतील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना योग्य संदेश जाईल आणि चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल, असा एक नेता देण्याची गरज होती. त्यामुळे मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपल्या सर्वाना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले होते. मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने दिला आणि तो फडणवीस यांनी मान्य केला, असे पाटील म्हणाल़े  पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार फडणवीस यांच्या त्यागाबद्दल सर्वानी त्यांना उभे राहून अभिवादन केले.

 पंकजा समर्थकांना खडेबोल

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्यावर पक्षनिर्णयाविरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. कोणाचाही नामोल्लेख न करता पाटील म्हणाले, फडणवीस यांनी त्याग केला, पण आपलीही काही जबाबदारी आहे. नगरपालिका किंवा कुठेही उमेदवारी मिळाली नाही की कार्यालय फोडायचे, रूसून बसायचे, हे योग्य नाही. सरकार आज आले, पण भाजप पक्ष म्हणून मजबूत होता, आहे व राहील.  पक्षाच्या नेत्यांवर श्रध्दा ठेवा. मनाचा मोठेपणा हे आपले वैशिष्टय़ आहे. मनाविरूध्द घडले तरी आपले दु:ख विसरून कामाला लागा. संघटना मजबूत करा. नेत्यांनी आदेश देण्याची गरज नाही. त्यांची इच्छा पाहून निर्णय स्वीकारावा. नाहीतर मनाविरूध्द घडले की आपल्या समर्थकांना किंवा गटाला घेऊन जिल्हा परिषदेतून बाहेर पडायचे, असले प्रकार करू नयेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पाटील यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत भाजपने समाजमाध्यमांवरून तातडीने काढून टाकली. ही ध्वनिचित्रफीत कशी व का बाहेर आली, हा आमचा अंतर्गत प्रश्न असून तो सोडविला जाईल, असे अ‍ॅडम् आशीष शेलार यांनी सांगितले.

भाजपकडून सारवासारव

‘‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने दु:ख झाले हे प्रदेशाध्यक्षांचे मत नाही़  त्यावेळच्या घडामोडी व प्रसंगाबाबत कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला’’, अशी सारवासारव भाजप नेते अ‍ॅड. आमदार आशीष शेलार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde chief ministership mind statement chandrakant patil executive meeting ysh
Show comments