मुंबई : गेल्या वेळी शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागा महायुतीत शिंदे गटाकडे कायम राहतील, असा दावा या पक्षाकडून केला जात असला तरी दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघरसह अन्य काही मतदारसंघ भाजपकडे जातील असेच चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईतून गेल्या वेळी शिवसेनेचे अरिवद सावंत हे निवडून आले होते. यामुळे या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा दक्षिण मुंबईतून ते उमेदवार असतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु देवरा यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आल्याने दक्षिण मुंबईत ते उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले. शिंदे गटाकडे अन्य कोणीही लोकसभा निवडणुकीच्या तोडीचा उमेदवार आज तरी नाही. कदाचित अन्य पक्षातील कोणत्या नेत्याने प्रवेश केल्यास त्याचा विचार होऊ शकतो. दुसरीकडे, दक्षिण मुंबईतून लढण्याची भाजपने तयारी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. याशिवाय पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने ते लोकसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत. परिणामी ही जागा शिंदे गटाला मिळावी, असा पालकमंत्री उदय सामंत यांचा प्रयत्न आहे. सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. पण सामंत यांचे बंधू रिंगणात असल्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक सोपी जाईल, असे भाजपच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष आहे. यामुळेच नारायण राणे यांना रिंगणात उतरविण्याची भाजपची योजना आहे. अर्थात, उदय सामंत यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच कायम राहील, असा दावा केला आहे. एकूणच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात उमेदवारीवरून चुरस होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा करून मिळविल्यास नारायण राणे यांचे राजकीय भवितव्य अधांतरी असेल.

हेही वाचा >>>  ‘ते’ तेव्हा तिथे..आता इथे!

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजपकडून लढण्याचे वेध लागले आहेत. २०१८ मध्ये ते भाजपच्या वतीने पालघरमधून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून आले होते. २०१९च्या निवडणुकीत पालगऱ् मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने गावित यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारली होती.

हिंगोली, परभणी, रायगड आदी मतदारसंघांवर भाजपचा डोळा आहे. गोंदिया-भंडारा मतदारसंघातून लढण्याची राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची इच्छा होती. पण त्यांना राज्यसभेची पुन्हा खासदारकी मिळाल्याने भंडारा-गोंदिया मतदारसंघ भाजपकडेच कायम राहील अशी चिन्हे आहेत.

रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच- अजित पवार

आगामी लोकसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढली जाईल. रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल आणि सुनील तटकरे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राज्यातील सर्व ४८ जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group to get south mumbai ratnagiri lok sabha constituency seat palghar for bjp zws