राज्यामधील अभूतपूर्व सत्तासंघर्षामध्ये शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव निवडणूक आयोगाने दिलं आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सध्याच्या घडामोडींवर पक्षाच्या नेत्यांनी भाष्य केलं.
नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत
मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीमध्ये राज यांनी काय सांगितलं याबद्दलची सविस्तर माहिती दिली. चर्चेदरम्यान लोक कंटाळले आहेत सत्ताधाऱ्यांना हीच वेळ आहे उभारी घेण्याची असं काही सांगितलं का राज यांनी? या प्रश्नावर संदीप देशपांडे यांनी, “उभारी तर आम्ही घेतलेलीच आहे,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: राजकीय सत्तासंघर्ष सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी बदलला WhatsApp DP; सूचक इशारा करणारा DP चर्चेत
तसेच पुढे बोलताना देशपांडेंनी शिवसेनेचं आणि बाळासाहेबांचं उदाहरण देताना दोनच दिवसांपूर्वी ठाण्यातील सभेत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावरुन टोला लगावला. भास्कर जाधव यांनी शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे रडले होते असं ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रविवारी म्हटलं होतं. त्याचाचसंदर्भ देशपांडे यांनी उभारी घेण्यासंदर्भातील प्रश्नाशी जोडला.
नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला
“सन्माननिय बाळासाहेबांनी १९६६ साली शिवसेना स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेला यशच मिळत गेलं का? नाही ना? त्यांना यश मिळालं, पराभव झाला. पण पराभवामुळे ते काही रडले नाहीत. परवा भास्कर जाधव सांगत होते आताचे पक्षप्रमुख रडत होते. मला वाटतं बाळासाहेब कधी रडले नाहीत. आम्ही २००९ ला विजय पाहिला. २०१४ मध्ये पराभव पण पाहिला. पण आम्ही कधी रडलो नाही. आम्ही लढलो,” असं म्हणत देशपांडेंनी थेट उद्धव यांचा उल्लेख न करता त्यांना टोला लगावला.
नक्की वाचा >> “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप
“आम्ही लढत राहू. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगल्या प्रकारचं यश मनसेचं असेल अशा प्रकारचा विश्वास राज ठाकरेंनी दिला,” असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच मनसेनं महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याची माहिती देताना देशपांडे यांनी रोज बैठका सुरु आहेत, गटनेत्यांना मार्गदर्शन दिलं जात असल्याचंही सांगितलं.