Aaditya Thackeray : मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ७४४२७.४१ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आज (४ फेब्रुवारी) सादर केला. या अर्थसंकल्पात विविध विकास कामांचा उल्लेख करत चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान ९२४६.६२ कोटी रुपयांनी अधिक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसेच विविध विकास कामांसाठी ४३१६५.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या या अर्थसंकल्पावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित करत महायुतीवर हल्लाबोल केला आहे. तसेच आंदोलनाचाही इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“भारतीय जनता पक्षाकडून मुंबईची एक वेगळ्या प्रकारची पिळवणूक सुरु आहे. आजचा अर्थसंकल्प पाहिला तर त्यामध्ये अनेक गोष्टी धक्कादायक आहेत. मुख्य म्हणजे अर्थसंकल्पात अदानी हे नाव दिसतं. तसेच अर्थसंकल्पात छोट्या दुकानांवर आता प्रॉफिट कर लावला जाणार असल्याचं सांगितलं आहे. हे कोणासाठी चाललंय? का चाललंय? जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला. मात्र, आज महायुतीच्या सरकारने मुंबईत अदानींसाठी दुकानांवर प्रॉफिट कर असा एक वेगळा कर लावला जात आहे. पुढेही असाच कर प्रत्येक घरांवर आणि झोपडपट्टीत लावला जाईल. मग हा अदानी कर नाही तर काय आहे?”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

धारावीतील लोक दुसरीकडे जाण्यास तयार नाहीत. त्यांना संपूर्ण माहिती पाहिजे. मुख्य म्हणजे अदानी अक्षरश:मुंबईला लुटत आहेत. अदानींना लोक नाकारत आहेत आणि विरोध म्हणून लोक त्या ठिकाणी राहतात. मात्र, आता त्यांच्यावर कर लावला जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे डंपिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने हटपलेलं आहे. तेच डंपिंग ग्राउंड आता मुंबई महापालिकेने घ्यायचं आणि अडीच ते तीन कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा तेच डंपिंग ग्राउंड स्वच्छ करून द्यायचं, असा सर्व प्रयत्न सुरु आहे”, असंहीआदित्य ठाकरे म्हणाले.

“आपण महापालिकेला जो कचरा देतो त्यावरही आता कर लावला जाणार, म्हणजे आपण जो कर भरतो त्यातूनही पैसे जाणार आणि पुन्हा या करातूनही पैसे जाणार आहेत. दुसरीकडे अदानी मुंबईतील जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा सर्व प्रकार थांबला पाहिजे, अन्यथा आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरणार आहोत. कारण आता मुंबईकरांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. मी मुंबई महापालिकेला आव्हान देतो की ५० टक्के तरी काम दाखवावं. इकबाल सिंह चहल आयुक्त असताना सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही लावू, पण कुठेही सीसीटीव्ही लागलेले नाहीत. कुठे किती काम पूर्ण झालं हे माहिती नाही. मात्र, मुंबईत रोड स्कॅम झाला हे नक्की आहे”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray group mla aditya thackeray on mumbai municipal corporation bmc budget 2025 politics gkt