अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेलेल्या बोटीला समुद्रात अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागत असून हे अरबी समुद्रात शिवस्मारकाचा हट्ट सोडा अशी मागणी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. हे स्मारक राजभवनात उभारलं गेलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
पुरुषोत्तम खेडेकर बोलले आहेत की, ‘अरबी समुद्रात स्मारक बांधल्यास असे प्रकार नेहमी होत राहतील. हे स्मारक जमिनीवर उभारण्यात आलं पाहिजे. जेणेकरुन कोणालाही, कधीही जाऊन हे स्मारक पाहता येईल’. यासोबतच हे स्मारक सिंहासनाधिष्ठित असावं अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाजी महाराज शूर असले तरी ते जनतेचे होते, त्यामुळे स्मारक सिंहासनाधिष्ठित असावं असं ते बोलले आहेत.
‘शिवस्मारक समुद्रात उभारलं तर भरतीवेळी ते बंद राहण्याची शक्यता आहे. सोबतच तिथपर्यंत प्रवास करणं खर्चिक राहिल. तिथे असणाऱ्या खाण्याच्या गोष्टी वैगेरे, तसंच इतर जे काही असेल ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर असेल. जर जमिनीवर स्मारक बांधलं तर पैसे वाचतील’, असंही ते बोलले आहेत.
ही दुर्घटना आपल्याला इशारा असून महाराजांचं काम लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील जन.ता आणि खऱ्या शिवप्रेमींसाठी स्मारक जमिनीवरच उभारलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत