राज्याबाहेरील नेत्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही कायम ठेवली. राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केल्याने राज्यातील पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं असून स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती असं स्पष्ट मत मांडलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील राज्यसभा निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पक्षाने विद्यमान खासदार पी. चिदम्बरम यांना तमिळनाडूत उमेदवारी दिली. महाराष्ट्रातून कवाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. प्रतापगढी यांची उमेदवारी रविवारी सकाळीच निश्चित करण्यात आली तेव्हा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दुसरा उमेदवार देण्याची मागणी दिल्लीत केली होती. विशेषत: अल्पसंख्याक विभागाच्या नेत्यांनी राज्याबाहेरील अल्पसंख्याक उमेदवार उभा करण्यास विरोध दर्शविला होता. परंतु पक्ष नेतृत्वाने नेहमीप्रमाणेच राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत बाहेरचा उमेदवार लादला. मुकूल वासनिक यांना राज्यातून उमेदवारी देण्याचे प्रस्तावित होते. परंतु राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इम्रान प्रतापगढी यांच्या नावाला विरोध दर्शविल्याने वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याऐवजी प्रतापगढी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
संजय राऊतांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “काँग्रेसची देशात जी स्थिती आहे ते पाहता फार कमी लोकांना ते संधी देऊ शकतात. पक्षात जी व्यवस्था करायची होती ती त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. आता यावर आम्ही काय बोलणार?”
“काँग्रेसने प्रमुख लोकांची सोय केली”
“काँग्रेसने त्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांची देशभरातून जिथे जिथे सोय करता येईल तिथे सोय केली आहे. स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती. पण कदाचित त्यांनी राष्ट्रीय स्तराचा, इतर राज्यांचा विचार केलेला दिसत आहे. संसदेत भाजपा सरकारला प्रत्युत्तर देणारी चांगली लोकं त्यांच्या नजरेत असू शकतात. कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर शिवसेनेनं बोलणं योग्य नाही,” असं ते म्हणाले.
काँग्रेसमधील नाराजीवर बोलण्यास नकार देताना संजय राऊतांनी हा हायकमांडचा विषय असल्याचं सांगत जास्त भाष्य करणं टाळलं. “मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते. काही मोठी गोष्ट असेल तर मुख्यमंत्री थेट सोनिया गांधींशी फोनवरुन चर्चा करत असतात,” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, “मुख्यमंत्री सक्षम आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले अशा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होत असते. निधीबाबत म्हणाल तर शिवसेनेचे आमदारही नाराज असतात. मुख्यमंत्री यावर मार्ग काढू शकतात”.
भाजपाने संभाजीराजेंची ढाल केली
“संभाजीराजे छत्रपती यांना कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न सुरु होता हे स्पष्ट झालं आहे. यांना आपला उमेदवार द्यायचाच होता, घोडेबाजार करायचाच आहे. पण त्यासाठी संभाजीराजेंची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही असून प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करुन अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारचंदेखील सर्व घडामोडींवर लक्ष आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
“आधी संभाजीराजेंना निवडणूक लढण्यास सांगितलं आणि आता नाव घेत नाही आहेत. संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करु शकतो, घोडेबाजार करु शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे. पण मग संभाजीराजेंना बळीचा बकरा का केलं?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.
यावेळी संजय राऊतांनी विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा आमच्याकडे असून दोन्ही उमेदवार जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. “महाविकास आघाडीचे आणखी दोन उमेदवारही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) विजयी होतील. अशाप्रकारे आमचे चार उमेदवार जिंकतील,” असं संजय राऊत म्हणाले.