लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ जेट्टी रोडवरील एका दिशादर्शक फलकावर काही दिवसांपूर्वी सहा फ्लेमिंगो आदळले होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. तर, दोन गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुन्हा त्याच दिशादर्शकावर आदळून तीन फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याची घटना झाली. पहिल्या अपघातानंतर पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी फ्लाईंग झोनमधील फलक काढून टाकण्याची मागणी केली होती. अखेरीस आता तो फलक काढून टाकण्यात आला आहे.

फ्लेमिंगोसाठी आवश्यक असलेले शेवाळ,मासे, किटक आदी खाद्य नवी मुंबई आणि उरण परिसरातील पाणथळी विपुल प्रमाणात असल्याने, तसेच वास्तव्यासाठी पोषक वातावरणही मिळत असल्याने हजारो किमी प्रवास करून फ्लेमिंगो येथे वास्तव्यासाठी येतात. परंतु त्यांच्या वाटेतील नेरूळ जेट्टी रस्त्यावरील दिशादर्शक फलक हा अडचणीचा ठरत होता.

आणखी वाचा-ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार

काही दिवसांपूर्वी हे पक्षी फलकावर आदळल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी हे दिशादर्शक फलक तातडीने हटवावा, अशी मागणी केली होती.तसेच येथे होऊ घातलेला जलवाहतूक प्रकल्प अयशस्वी ठरल्याने जेट्टी वापरात आलेली नाही.त्यामुळे सिडको पाम बीच रोडवर एक कमान उभारून त्यावर दिशादर्शक चिन्ह लावावे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्या अपघातानंतर काही दिवसानेच याच दिशादर्शक फलकाला आदळून आणखी तीन फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. पाठोपाठ झालेल्या अपघातानंतर हा दिशादर्शक फलक काढून टाकण्याचे आदेश सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर हा फलक हटविण्यात आला आहे.

ठाणे खाडी फ्लेमिंगो परिसरात भरतीची पातळी १५ सें.मीच्या पुढे गेल्यावर हजारो फ्लेमिंगो नवी मुंबईच्या पाणथळ जागेवर विश्रांतीसाठी येतात. त्यामुळे बेलपाडा, भेंडखळ,पाणजे,एनआरआय-टीएस चाणक्य आणि भांडुप उदंचन केंद्र येथील पाणथळ जागा संरक्षित कराव्या, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signpost in navi mumbai was removed after flamingos death mumbai print news mrj
Show comments