‘आदर्श’ घोटाळ्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अशोक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले असताना चव्हाण यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते का वा ती सुनावणी घेणे योग्य होईल का, असा उलट सवाल न्यायालयाने चव्हाण यांच्या वकिलांना करीत चव्हाण यांना ‘हलकासा’ धक्का दिला.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्या खंडपीठासमोर चव्हाण यांची याचिका सुनावणीस आली. त्या वेळी ‘आदर्श’प्रकरणी चव्हाण यांच्यासह १३ आरोपींवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याची माहिती देण्यात आली. तेव्हा आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या याचिकेवर सुनावणी घेणे किती योग्य वा त्यात सुनावणी घेण्याइतपत काही शिल्लक आहे का, असा सवाल न्यायालयाने चव्हाण यांच्या वकिलांना केला.
या नंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १५ मार्चपर्यंत तहकूब केली.