मुंबई : निवडणूक जाहीर झाल्या झाल्या राज्यातील सत्ताधारी युतीत एका वेगळ्याच वादास तोंड फुटले. हा वाद आहे कोणी किती त्याग केला आणि कोणास त्याचा फायदा झाला?

महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत ‘मुख्यमंत्रीपद तुम्हाला देताना भाजपच्या नेत्यांनी मोठा त्याग केला’, या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या कथित विधानाचे वृत्त बुधवारी पसरले आणि त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील खदखद बाहेर पडू लागली. शहा यांचे हे कथित वक्तव्य आताच प्रसार माध्यमांकडे पोहचविण्यामागे भाजपचा डाव असल्याची भावना शिवसेनेत निर्माण झाली आणि त्यातून ‘आम्हीदेखील तेवढाच त्याग केला’ असे प्रत्युत्तर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी भाजपला दिले. हे प्रकरण वाढणार असे दिसल्यावर ‘असे काही घडलेच नाही’, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सारवासारव करावी लागली.

हेही वाचा >>>सरकारकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेतलेले निर्णय वादाच्या भोवऱ्यात

भाजप आणि शिवसेनेत (शिंदे) सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिंदे दावा करीत असलेल्या जागा देण्यास भाजप तयार नाही. या पार्श्वभूमीवर शहा गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले असता महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली. तेव्हा अमित शहा यांनी ‘आमच्या नेत्यांनी केलेल्या त्यागामुळे तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले’, असे विधान शिंदे यांस उद्देशून केले असे म्हणतात. लगेच अमित शहा यांच्या या कथित विधानाला आताच कसे पाय पुटले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. शिंदे यांनी कमी जागांवर समाधान मानावे यासाठीच्या दबाव तंत्राचा भाग म्हणून ही बातमी भाजपच्या गोटातून फोडण्यात आल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील भाजप नेत्यांचा ठाम विरोध असतानाही शिंदे यांनी नवी दिल्लीत चर्चा करून १५ जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. विधानसभेच्या जागावाटपात शिंदे याच रणनीतीचा वापर करण्याची भीती भाजप नेत्यांना आहे. यातूनच शिंदे यांनी नमते घ्यावे यासाठीच अमित शहा यांच्या विधानाचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी याबाबत राज्यातील भाजप नेत्यांस बोल लावले. आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले तसेच भाजपचाही तेवढाच फायदा झाला. प्रत्येकाची भूमिका योग्यच आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे (शिंदे) आमदार आणि एस. टी. मंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिले. वृत्तवाहिन्यांशी बोलताना शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनीही कथित वक्तव्यावर टिप्पणी केली.

हेही वाचा >>>बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही

असे कोणतेही विधान नाही मुख्यमंत्री

भाजप नेत्याने त्याग करून तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही काही जागांचा त्याग करावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती का, असे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावर असे काहीही घडले नाही, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. उलट ‘तुम्ही त्या बैठकीला होतात का’ असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकाराला विचारला. ‘शहा यांच्याबरोबरच्या बैठकीला शिंदे, अजित पवार आणि मी होतो, आम्ही इथेच असून आमच्यापैकी कोणीही शहा यांच्या सूचनेबाबत सांगितलेले नाही’, असे फडणवीस म्हणाले. तर ही ‘टेबल न्यूज’ असल्याची टिप्पणी अजित पवार यांनी केली.

भाजपने जसा त्याग केला तसाच त्याग आम्हीदेखील केला आहे. किंबहुना आम्ही केलेल्या त्यागामुळेच महायुतीची राज्यात सत्ता आली. भरत गोगावलेआमदार, शिवसेना (शिंदे)