मिरगी येणे म्हणजेच फिट येण्याचा त्रास अनेकांना असतो. मिरगी येण्याचे प्रमाण हे कमी अधिक असले तरी ती अचानक येत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात मिरगीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येते. केईएममध्ये आतापर्यंत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर यापैकी २५० जणांचे आयुष्य पूर्णत: बदलले असून, ते आनंदी आयुष्य जगत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मुंबई महानगरपालिकेची प्रभागसंख्या कमी करण्याच्या कायद्याला आव्हान

अनेकदा लहान मुलांना तीव्र ताप आल्यावर किंवा मेंदूमध्ये काही गुंतागुंत निर्माण झाल्यास मिरगीचा त्रास सुरू होतो. मिरगी अचानक येत असल्याने अनेकदा ती नागरिकांच्या जीवावर बेतते. त्यामुळे मिरगीपासून सुटका व्हावी यासाठी नागरिकांचे प्रयत्न असतात. अनेकांना औषधाेपचाराने मिरगीचा त्रास नियंत्रणात आणणे शक्य असते. मात्र २० ते २५ टक्के नागरिकांना होणारा त्रास हा औषधानेही बरा होत नाही. अशावेळी त्यांची व्हिडिओ ईईजी, एमआरआय, पेट स्कॅन, न्युरो सायकोलॉजी यांच्या माध्यमातून तपसाणी करण्यात येते. या तपासणीमध्ये मेंदूचा नेमका कोणता भाग ग्रस्त झाला आहे, शस्त्रक्रियेद्वारे तो कमी करता येऊ शकतो हे स्पष्ट होते. ही तपासणी केल्यानंतरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येतो. त्यानुसार केईएम रुग्णालयात आतापर्यंत ६४६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये लहान बालकांपासून मोठ्या रुग्णांचा, तसेच १८ वर्षांवरील ५४० रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मागील १० वर्षांतील रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा सध्या रुग्णालयाकडून घेण्यात येत आहे. यामध्ये २५० नागरिकांनी मिरगी संदर्भात केलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य पूर्णत: बदलून गेले आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आयुष्य आनंदी झाले असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. संपूर्ण राज्यामध्ये फक्त केईएम रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते. मिरगीसंदभार्तील शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या या शस्त्रक्रियेत महत्त्वाची असलेल्या व्हिडिओ ईईजी विभागाचे नूतनीकरण केईएम रुग्णालयात करण्यात आले. त्याचे उद््घाटन गुरूवारी करण्यात आले.

हेही वाचा- ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’चे लोकार्पण; मुंबईत पहिल्या टप्प्यात ५१ दवाखाने सुरू

अवघ्या पाच हजारांत होते शस्त्रक्रिया

मिरगी येणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केईएम रुग्णालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात. त्यानुसार ही शस्त्रक्रिया अवघ्या पाच हजारांमध्ये केली जाते. तर त्यासाठी आवश्यक असलेली व्हिडिओ ईईजी ही सात हजारांमध्ये करण्यात येते. शस्त्रक्रियेच्या वेळी काही गुंतागुंत झाल्यास हा खर्च ३५ हजारांपर्यंत जाऊ शकतो. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यासाठी ६५ ते ७० हजारांपर्यंत खर्च येतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful surgery on 646 epilepsy attack patients in kem hospital mumbai print news dpj