लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने ‘टी – २०’ विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा गौरव करण्यासाठी आणि हा विजय साजरा करण्यासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. खुल्या बसगाडीमधून अथांग समुद्रासमोरून ही विजयी मिरवणूक वानखेडे स्टेडियमकडे मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये विजयोत्सव साजरा होणार आहे. या विजयोत्सवाचा साक्षीदार बनण्यासाठी बहुसंख्येने चाहत्यांनी गर्दी केली असून वानखेडे स्टेडियम हाऊसफुल्ल झाले आहे. मुंबईतील विजयोत्सवात मुसळधार पावसानेही हजेरी लावली आहे, मात्र चाहत्यांचा जोरदार जल्लोष सुरुच आहे.

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानक, वानखेडे स्टेडियम, मरिन ड्राईव्ह आणि नरिमन पॉईंट परिसरात चाहत्यांची गर्दी उसळलेली आहे. भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून अनेकजण या विजयोत्सवात सामील झाले आहेत. भारताचा राष्ट्रध्वज, अभिनंदनपर फलक आणि भारतीय क्रिकेट संघाची जर्सी हातात घेऊन तरुणाईच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे. मुंबईच्या दिशेने लोकल गाड्या भरून चर्चगेटपर्यंत पोहोचत आहेत. लोकलमध्येही तरुणाईकडून घोषणाबाजी सुरू आहे. तसेच, चर्चगेट परिसरात वाहतूक कोंडीचेही चित्र पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई : ७६ वर्षीय व्यक्तीची अडीच कोटींची सायबर फसवणूक

भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात तब्बल १७ वर्षांनंतर ‘टी – २०’ विश्वचषकाला गवसणी घातली, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वकौशल्याचेही भरभरून कौतुक होत आहे. मुंबईतील विजयोत्सवात ‘मुंबईचा राजा – रोहित शर्मा’ या घोषणेने तरुणाईने परिसर दणाणून सोडला आहे. तसेच, ढोल – ताशांच्या गजरात तरुणाई थिरकत आहे. ‘टी – २०’ विश्वचषकाची प्रतिकृती आणि भारतीय खेळाडूंची प्रतिमा असलेले फलकही हातात घेऊन मनसोक्तपणे नाचत आहेत. तर हा अविस्मरणीय क्षण अनेकजण मोबाईलच्या कॅमेरात टिपत आहेत.