लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवूनही शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.
शासकीय काम करून घेण्यासाठी लाचेची मागणी करणारे व ती घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येतात. याबाबतच्या कार्यवाहीत काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षाही ठोठावल्या आहेत. मात्र, त्यातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने ते अद्यापही शासकीय सेवेत कार्यरत आहेत. याची फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दिले. तसेच या दोषी ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न होण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांकडूनही खुलासे मागविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी दिले.