टाटा वीज कंपनीच्या युनिट ६ मधील प्रकल्पामुळे मुंबईकरांचा वीजदर १३ रुपये २३ पैशांवरून ४ रुपये ४८ पैसे एवढा कमी होणार असून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून अत्याधुनिक यंत्रणेचा वापर होणार असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर टाटा पॉवर कंपनीने प्रसिद्धीपत्रकातून देऊन या कंपनीविरोधात शिवसेनेने काढलेल्या मोर्चातील हवाच काढून घेतली. शिवसेनेच्या मोर्चाला ‘टाटां’नी दिलेला हा शॉकच ठरला.
शिवसेनेने चेंबूर येथील टाटा पॉवरच्या युनिट ६मधील गॅस ते कोळसा परिवर्तन रद्द करण्याची तसेच युनिट ५ व ८ मधील कोळशाचा वापर तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मात्र शिवसेनेने उपस्थित केलेले सर्व आक्षेप टाटा पॉवर कंपनीने आपल्या पत्रकात खोडून काढले आहेत. गेली नऊ दशके टाटा पॉवर कंपनीकडून मुंबईकरांना विजेचा माफक दरात पुरवठा करण्यात येत आहे. यापुढेही आमचा मुंबईकरांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याचा मानस असून चेंबूर येथील युनिट ६च्या अत्याधुनिकरणासाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना असल्याचे टाटाच्या पत्रकात नमूद केले आहे.
या अत्याधुनिकीकरणाचा फायदा मुंबईकरांनाच होणार असून विजेचा दर १३ रुपये २३ पैशावरून ४ रुपये ४८ पैसे एवढा खाली होणार आहे. याचाच अर्थ तब्बल ६६ टक्क्य़ांनी दर खाली येणार आहे. मुंबईची विजेची गरज ३४०० मेगाव्ॉट असून सध्या विजेची निर्मिती केवळ २३७७ मेगाव्ॉट एवढी होत आहे. या पाश्र्वभूमीवर अत्याधुनिकीकरणामुळे युनिट ६मधील विजेचे उत्पादन वाढणार असल्याचा दावाही टाटाच्या पत्रकात करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या मोर्चेबाजीच्या दबावतंत्रापुढे कोणत्याही परिस्थितीत न झुकण्याची भूमिका टाटा पॉवर कंपनीने दाखवली आहे.
युनिट सहामधील प्रकल्पाच्या अत्याधुनिकीकरणाचा फायदा मुंबईकरांनाच होणार असून विजेचा दर १३ रुपये २३ पैशावरून ४ रुपये ४८ पैसे एवढा खाली होणार आहे, असा कंपनीचा दावा आहे. याचाच अर्थ मुंबईकरांच्या विजेचा दर तब्बल ६६ टक्क्य़ांनी खाली येणार आहे.