मुंबई : गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात सुमारे २ अंशाने घट झाली असून त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी सौम्य गारवा आणि दुपारच्या वेळी उबदार वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र सध्याचे सरासरी कमाल तापमान २ अंशाने कमी आणि किमान तापमान २ अंशाने अधिक असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. तर, येत्या दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होणार असून किमान तापमान २० अंशापुढे आणि कमाल तापमान ३० अंशापुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईसह राज्यात सध्या संमिश्र वातावरण तयार झाले आहे. ढगाळ वातावरण, सौम्य गारवा आणि उष्णता जाणवत आहे. यात हवा प्रदुषणही वाढत आहे. परिणामी, नागरिकांना प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागातील तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र, काही दिवसांत पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा >>> “राजन विचारे यांच्या सुरक्षेत कशाच्या आधारे कपात?” सुरक्षा कपातीबाबतचा अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

मंगळवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १९.८ अंश आणि कुलाबा येथील किमान तापमान २०.५ अंश नोंदवण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात काही प्रमाणात बदल झाला आहे. पारा खाली आला असून साधारणशी थंडी पडली आहे. मात्र, हे वातावरण काहीच दिवस राहणार असून पुन्हा तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे. राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temperature in mumbai drop by two degrees in two days mumbai print news ysh