मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘स्वामी समर्थ नगर - विक्रोळी मेट्रो ६’ प्रकल्पातील कांजूरमार्ग कारशेडची जागा ताब्यात आल्यानंतर तिच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. महिन्याभरात कांजूरमधील कारशेडसाठी निविदा जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो ६’ मार्गिकेतील कारशेड कांजूरमार्ग येथे प्रस्तावित करून २०१६ मध्ये त्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. मात्र ‘कुलाबा - वांद्रे - सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड कांजूरमार्गला हलविल्यानंतर मोठा वाद सुरू झाला होता. या वादात ‘मेट्रो ६’ची कारशेडही अडकली. एकीकडे ‘मेट्रो ६’चे काम सुरू असताना आणि २०२५ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल करण्याचे नियोजन असताना कारशेड मात्र अडकली होती. त्यामुळे एमएमआरडीएने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून कांजूरच्या जागेसाठी आग्रह धरला होता. अखेर एमएमआरडीएच्या पाठपुराव्याला यश आले. एप्रिलमध्ये कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांरित करण्यात आली.वैद्यकीय विभागातील वर्ग ३ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरणार हेही वाचा >>>वैद्यकीय विभागातील वर्ग ३ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरणार ही जागा ताब्यात आल्यानंतर १५ दिवसांत, एप्रिल अखेरीस वा मेच्या पहिल्या आठवड्यात कारशेडच्या बांधकामासाठी निविदा जारी करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. पण आता निविदा जारी होण्यासाठी आणखी महिनाभराचा काळ लागणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. मात्र सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून निविदा जारी करण्यासाठी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे निविदा महिन्याभरात जारी होईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कारशेडच्या कामाला सुरुवात होईल. बांधकाम सुरू झाल्यापासून ३० महिन्यात कारशेड पूर्ण करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.