मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. यानुसार मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ केला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिली. तसेच हा क्रांतीकारी निर्णय असून राज्यातच नाही, तर देशातही असा निर्णय घेण्याचं धाडस कुणी केलं नसल्याचं नमूद केलं. ते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकास विभागाला मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना सरसकट सर्वांना मालमत्ता कर माफ करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हा क्रांतीकारी निर्णय आहे. असा निर्णय घेण्याचं धाडस राज्यातच नाही तर देशातही कुणी केलं नसेन. मुंबई आणि शिवसेना हे नातं कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. मुंबईकरांनी नेहमीच भरभरून प्रेम केलं आहे.”

“मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ आहे. त्यांनी रुग्णालयात असूनही जनतेचे काम केले. शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते. कोविड काळात विकास कामांना कात्री लावली नाही. सर्वसामान्यांच्या हिताचा हा निर्णय घेतले,” असं एकनाश शिंदे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत.
  • शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी देखील नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो. आता हे काम आदित्य करत आहे.
  • सुविधा द्यायच्याच आहे, नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करतांना मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे.
  • मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे.
  • मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत.
  • आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल.
  • शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते.  जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत.
  • २०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे.
  • ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो.
  • देशाचा आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबईला उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय, त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत.
  • या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा
  • सामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्‍याचा हा प्रयत्न.
  • मला जाणीव आहे की केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेला देणे हे आपले कर्तव्यच.
  • मुंबईकरांना वचन देतो,  तुमच्या सगळ्या  गोष्टीची पुर्तता करण्यास, दिलेली वचन पूर्ण करण्यास मी वचनबद्ध आहे फक्त तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या.

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंसारखा सक्षम माणूस हे राज्य चालवू शकतो, पण…”, रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाची बैठक. बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray government announce no property tax up to 500 square feet houses in mumbai pbs