आज जागतिक ‘थॅलेसेमिया’ दिन : चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्ण मुंबईत
राज्यात ‘थॅलेसेमियाग्रस्त’ रुग्णांमध्ये दरवर्षी वाढ होत असून यातील चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्ण हे एकटय़ा मुंबईत आहेत. आजच्या ‘जागतिक थॅलेसेमिया दिना’च्या पाश्र्वभूमीवर हे वास्तव पुढे येत असून नागरिकांमध्ये थॅलेसेमियाबद्दल जागृती नसल्याने या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील काळात जागृती न झाल्यास ही संख्या वाढण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रक्तातील दोषांमुळे निर्माण होणाऱ्या थॅलेसेमिया आजाराच्या सद्यस्थितीबाबत संपूर्ण देशातच चिंतेचे वातावरण आहे. आजघडीला देशात मोठय़ा प्रमाणावर रुग्ण नसले तरी ही संख्या हळूहळू वाढत आहे. थॅलेसेमिया वाहक (मायनर) आई-वडिलांमुळे त्यांची मुले थॅलेसेमियाचे रुग्ण होतात. थॅलेसेमिया वाहक हे आपले आयुष्य निरोगी माणसाप्रमाणे जगतात, मात्र थॅलेसेमियाग्रस्तांना वारंवार रक्त द्यावे लागते.
यात अनंत अडचणी येतात, तर काहींचा मृत्यूदेखील होतो. सध्या संपूर्ण देशात असे किमान ५ कोटी थॅलेसेमिया वाहक आढळल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे.
त्यामुळे तरुणांनी लग्न करण्यापूर्वी अथवा पालकांनी मूल होण्यापूर्वी ते थॅलेसेमिया वाहक आहेत की नाहीत हे तपासून घेणे आवश्यक ठरते.
मुलांना आधार हवा
थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मानसिक आधाराची नितांत आवश्यकता असून त्यांना इतर मुलांप्रमाणे विरंगुळ्याचे क्षण अनुभवता आले पाहिजेत. सध्या याबाबत जागृतीची गरज जास्त असून मुंबईत दर दोन महिन्यांत नवा रुग्ण दाखल होत आहे, असे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाच्या पालक व मुंबई थॅलेसेमिक सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पा रुपारेलिया यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा