रविवारी सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. दुपापर्यंत धीम्या गतीने सुरू असलेली अप आणि डाऊन सेवा ठिकठिकाणी रेल्वेरूळांवर पाणी साचल्याने तसेच सिग्नल यंत्रणेत घोळ झाल्यामुळे काही काळ ठप्प झाली होती. परिणामी दुपारी ठाणे ते दादर प्रवासाला तब्बल दीड तास लागत होता. सुट्टीच्या दिवशी नोकरदारांबरोबरच मुलाबाळांसह फिरायला बाहेर पडलेल्या लोकांना लोकल सेवेच्या खोळंब्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला.
दुपारी एक-दीड वाजल्यानंतर कल्याण ते सीएसटी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला. ठाण्याला दुपारी २.३५ वाजता आलेली धीमी लोकल सुमारे ७-८  मिनिटे फलाटावरच थांबल्यानंतर सोडण्यात आली. त्यानंतर ही लोकल दादरला पोहोचेपर्यंत तब्बल ४.३० वाजले. दुपारनंतर हलक्या सरी पडत असल्या तरी सकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे संध्याकाळपर्यंत मध्य रेल्वेची डाऊन आणि अप दोन्ही मार्गावर धावणाऱ्या लोकल सुमारे दीड तास उशिराने धावत होत्या.
विद्याविहार आणि कुर्ला स्थानकांच्या दरम्यानचे रूळ पाण्यात बुडून गेले होते. परंतु, ठाणे – दादर मार्गावर दुपारी अन्य कुठल्याही स्थानकांच्या दरम्यानच्या रूळांवर पाणी साचले नव्हते. तरीसुद्धा वाहतूक अतिशय विलंबाने सुरू राहिल्याने प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.
 एक दिवस सहकुटूंब फिरायला किंवा नातेवाईकांच्या भेटीला जावे तर लोकलच्या खोळंब्याने तेही जमू शकत नाही अशी खंत व्यक्त करत मुंबईकर लोकल प्रवाशांनी मध्य रेल्वेला लाखोली वाहिली.
एकीकडे मध्य रेल्वेची वाहतूक पुरती कोलमडली असतानाच जलद गाडीने दादर ते चर्चगेट प्रवासासाठीही तब्बल ४०-४५ मिनिटांचा कालावधी लागत होता. दुपारी ४.०२ मिनिटांची चर्चगेटकडे जाणारी लोकल पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गाच्या चार नंबरच्या फलाटावर ४.२५ वाजता आली आणि धीम्या गतीने प्रत्येक स्थानकाच्या जवळ थांबत तब्बल ४०-४५ मिनिटांनी चर्चगेटला पोहोचली. मध्य रेल्वेची वाहतूक अतिशय धीम्या गतीने होत असल्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी दादरला उतरून चर्चगेटमार्गे जाण्याचा विचार केला खरा परंतु तिथेही पाऊण तास प्रवास करावा लागल्याने प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या नावानेही बोटे मोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* पाऊस आणि मरीन ड्राइव्ह
 पावसाने संपूर्ण मुंबई शहर आणि परिसर येथे थैमान घातले असले, तरीही मुंबईकरांनी मात्र घराबाहेर पडत पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. पावसाळ्यात उधाणलेल्या दर्याची मजा लुटायला अनेक जण लोकल गाडय़ांमध्ये तासन् तास प्रतीक्षा करून मुंबईच्या दिशेने आले. तर काहींनी रस्त्यात तुंबलेल्या पाण्यातून आपल्या गाडय़ा पुढे काढत वरळी सी-फेस किंवा मरीन ड्राइव्ह गाठला. वाफाळत्या चहाचा कप, गरम शेंगदाणे, भुईमुगाच्या शेंगा अशा पदार्थावर ताव मारत अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला.

* मुंबईतील परळ, अंधेरी मार्केट, डी. एन. नगर, मालाड सबवे, चेंबूर येथील गिडवानी जंक्शन, काळाचौकी परिसर, शिवडी फाटक, किडवई नगर पोलीस चौकी, हिंदमाता, सायन स्थानक परिसर आदी ठिकाणी रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. दुपापर्यंत पावसाचा जोर कमी न झाल्याने रेल्वेमार्ग किंवा रस्ते यांवरील पाणी कमी होत नव्हते. पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग यांसह लाल बहादूर शास्त्री मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग या प्रमुख मार्गावर पाणी तुंबल्याने सुटीच्या दिवशी बाहेर पडलेल्या मुंबईकरांच्या वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. माटुंगा-सायन परिसरात तर बसगाडय़ांच्या टायरच्या वपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे मोटारसायकल स्वारांबरोबरच चारचाकी वाहन चालकांचीही तारांबळ उडाली.

* पुण्यात तीन ठार
पुणे : येथील दांडेकर पुलाजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या सोसायटीची दहा ते बारा फूट उंचीची संरक्षक भिंत कोसळून तीन महिलांचा मृत्यू झाला. िभतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती असल्याची शक्यता गृहीत धरून अग्निशामक दलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. ढिगाऱ्याखाली चार ते पाच मोटारीही दबल्या गेल्या. या प्रकरणी पोलिसांकडून तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

*  दोन जण बेपत्ता
ठाणे : मुंब्रा येथील खाडीमध्ये रेती उपसण्यासाठी गेलेले दोन जण बोट उलटल्याने बेपत्ता झाले आहेत. मुसळधार पावसाकडे दुर्लक्ष करून हे दोघे खाडीमध्ये गेले होते. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने त्यांच्या शोध सुरू होता, पण सायंकाळपर्यंत त्यांच्या शोध लागला नाही. शिळफाटा-महापे रस्ता आणि माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या खुंटवली शाळेची संरक्षक भिंत रविवारी पहाटे कोसळली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

* पावसाच्या माऱ्यापुढे घरांना तडे
 प्रतिनिधी, मुंबई
रविवारच्या पावसाने शहरात पाच ठिकाणी विविध इमारतींचे काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र या पाचही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. घरांना तडे जाण्याच्या घटनेबरोबरच साकीनाका खाडी-३ भागातील दरड कोसळली. मात्र या घटनेतही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.साकीनाका भागातील गुप्ता सदन चाळ येथे असलेल्या एका शाळेची भिंत सकाळी साडेआठच्या सुमारास पडली. रविवार असल्याने सुदैवाने शाळेत कोणीच नव्हते. त्यामुळे कोणतेही शारीरिक नुकसान झाले नाही. साकीनाका भागातीलच खाडी-३ भागातील बरेली मस्जिदच्या मागे असलेली दरडही याच दरम्यान कोसळली. २००५मध्ये याच दरडीचा भाग कोसळून ७४ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र रविवारी तसा अनुचित प्रकार घडला नाही.
सायन-ट्रॉम्बे रोड रोड, देवनार येथेही सकाळी सव्वादहाच्या सुमारास एका इमारतीच्या सज्जाचा भाग कोसळला. आणखी एक घटना घडली ती रे रोड स्थानकाजवळ! या स्थानकाजवळ असलेल्या पालिकेच्या पंपिंग स्टेशनची भिंत कोसळली. मात्र येथेही कोणालाही दुखापत झाली नाही. टीबी रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या पहिल्या माळ्याच्या सज्जाचा काही भागही दुपारी तीनच्या सुमारास कोसळला. या घटनेतही सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

* नवी मुंबईत दगडखाणीची भिंत कोसळून दोन ठार
खास प्रतिनिधी, नवी मुंबई</strong>
 संततधार पडणाऱ्या पावसामुळे खैरणे एमआयडीसीतील महावीर दगडखाणीची संरक्षण भिंत कोसळून आज दुपारी या भिंतीजवळील झोपडीत राहणारे दोन जण जागीच ठार झाले. अरुण दास आणि दिनेश दास अशी ठार झालेल्या कामगारांची नावे असून एक कामगार जखमी झाला आहे.
खैरणे एमआयडीसीलगत असणाऱ्या डोंगरात अनेक दगडखाणी आहेत. त्यातील महावीर दगडखाणीच्या क्रशरला घालण्यात आलेली संरक्षण भिंत आज दुपारी कोसळली. त्यात भिंतलगत राहणारे दोन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने जागीच ठार झाले. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या साहाय्याने दगडीचा हा ढिगारा उपसल्यानंतर या दोघांचे मृतदेह आढळून आले. याशिवाय तीन कामगाराना या ढिगाऱ्यांतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ही दगडखाण राष्ट्रवादीचे नगरसेवक अमित मेढकर यांच्या वडिलांच्या संस्था कंपनीच्या नावावर आहे. त्यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
* एका तरुणाचा बुडून मृत्यू
ऐरोली सेक्टर एक येथील तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने  २२ वर्षीय तरुण मनोज वेळंबे बुडून मृत्यू पावल्याची घटनाही आज नवी मुंबईत घडली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane to dadar travel only in one and half hour
Show comments