मुंबई : पुणे – अहमदनगर मार्गावर १ जून, १९४८ रोजी एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे शनिवार, १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानकांलक रांगोळी काढून, फुला- पानांची तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत.

गेली ७६ वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आताही ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अनेक अडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. त्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस राबत आहेत. केवळ ३६ बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षांत १५ हजार बसपर्यंत पोहोचला आहे. या बसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकांवरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे.

हेही वाचा : मुंबई: विरार – वैतरणादरम्यान गर्डर बदलण्यासाठी ब्लॉक

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनी अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये ३३ टक्क्यांवरून १०० टक्कयांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते. याबरोबरच गणेशोत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिकी यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या चालवून, एसटी सर्व सामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठी देखील एसटी सेवा पुरवीत आहे. गेली ७६ वर्षे प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ बनली आहे. भविष्यातही प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी कटिबध्द राहील, अशी ग्वाही देत, लाखो प्रवाशांना एसटीच्या वतीने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी शुभेच्छा दिल्या.