मुंबई : वेतनाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे संतप्त झालेले राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) कर्मचारी पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, राज्य सरकारने शुक्रवारी वेतनासाठी १०० कोटी आणि सवलत मूल्यापोटी २२४.७४ कोटी रुपये असा एकूण ३२४.७४ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. त्यामुळे एस.टी. महामंडळातील सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तूर्तास सुटण्याची शक्यता आहे.
वेतन आणि अन्य मागण्यांसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांचे राज्यातील विविध आगारांमध्ये आंदोलन सुरू आहे. अनेक कर्मचारी आर्थिक समस्येमुळे आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे एस.टी. कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात होते, मात्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल याची खबरदारी घेतली आहे. महामंडळाने कारभारात सुधारणा करून तूट भरून काढून उपाययोजना करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाला दिल्या. त्यानंतर शुक्रवारी निधी जाहीर केला आहे.
दरमहिना २२० कोटी रुपये आवश्यक राज्य सरकारने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी सुमारे २९ प्रकारच्या सवलत योजना जाहीर केल्या आहेत. या सवलती एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात येतात. या सवलतींचे उत्तरदायित्व राज्य सरकारचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने सवलत योजनेपोटी दरमहिना सुमारे २२० कोटी रुपये एस.टी. महामंडळाला देणे क्रमप्राप्त आहे.