लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील आरोग्य क्षेत्रात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी ताणतणाव, नैराश्याने ग्रासले असून मानसिक तणावामुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना मानसिक आधाराची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन तज्ज्ञ व्यक्तींमार्फत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी, तसेच त्यांच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारने ‘संवाद’ ही मानसिक हेल्पलाईन सुरू केली आहे. ‘संवाद’मुळे विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान येणाऱ्या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे.
राज्यामध्ये दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे सहा ते सात हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. वैद्यकीय शिक्षण अवघड असल्याने आणि शिक्षणादरम्यान कुटुंबापासून दूर राहवे लागत असल्याने अनेक विद्यार्थांच्या मनामध्ये भिती व नैराश्य निर्माण होत असते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
हेही वाचा… मुंबई लोकलचा ‘हा’ Video पाहून तुम्हालाही येईल राग; अशा बेजबाबदार प्रवाशांना काय शिक्षा हवी?
परिणामी, काही विद्यार्थी मानसिक तणावाखाली वावरत असतात. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने राज्यातील, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयातील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानसिक समुपदेशन, तसेच मार्गदर्शन करण्यासाठी ‘संवाद’ ही मानसिक आरोग्य हेल्पलाईन सुरू केली आहे. पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या माध्यमातून ही हेल्पलाईन चालविण्यात येणार आहे. या हेल्पलाईनसाठी १४४९९ हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आला आहे.