मुंबई : गणेशोत्सवानिमित्ताने एसटीला प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दर्शवला असून ४,९५३ जादा बस आतापर्यंत पूर्ण भरल्या आहेत. मात्र गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असताना महाराष्ट्रात एसटीची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एसटी कामगाराने संयुक्त कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने ३ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी अधिक रक्कम मोजावी लागेल, राज्य सरकारने ‘व्हीआयपी’ वाहन क्रमांकाचे दर वाढवले

हेही वाचा – वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एस.टी. महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे ३ सप्टेंबर रोजी एसटी कामगार काम बंद ठेवून धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी बंद झाली तर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, गणेशभक्तांची गैरसोय झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा कृती समितीने दिला आहे.