मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसरी लोकसभा निवडणूकही एकतर्फी होईल, असे बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवलेले निष्कर्ष आणि भाजपसमर्थक तसेच अनेक माध्यमांचे अंदाज खोटे ठरवत भारतीय मतदारांनी मंगळवारी दहा वर्षांनी प्रथमच संमिश्र कौल दिला. ४०० चा आकडा दूरच, परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०० चा आकडाही पार करता आला नव्हता. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला तर २५० जागांच्या पुढे मजल मारता आली नाही.

अर्थात पूर्ण बहुमताच्या जोरावर रालोआच पुढील सरकार स्थापणार हे निश्चित असले, तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आघाडी सरकार येणार आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत किंवा त्याआधी १३ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत कधीही आघाडी सरकारच्या माध्यमातून कारभार केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सर्वस्वी नवीन प्रयोग असेल. ३५० ते ४०० जागा किंवा कदाचित त्याच्याही पुढे रालोआ जाईल, तसेच भाजप सलग दुसऱ्यांदा ३०० जागांच्या पल्याड मजल मारेल, या समजुतीमध्ये राहिलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा विलक्षण अपेक्षाभंग झाला.

हेही वाचा >>>Mumbai Lok Sabha Election Result 2024 : फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण अन् विजयी जल्लोष

पण मंगळवारी भाजपच्या किंवा रालोआच्या पीछेहाटीइतकीच लक्षणीय ठरली काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीची अनपेक्षित मुसंडी. काँग्रेस पक्ष दहा वर्षांनी प्रथमच १०० पार गेला, तर इंडिया आघाडीने पहिल्याच प्रयत्नात २०० पार दमदार मजल मारली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरयाणा, कर्नाटक या राज्यांमध्ये इंडिया आघाडीने अनेक धक्कादायक विजय नोंदवले. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपची अनपेक्षित पडझड घडवून आणली. कर्नाटकात काँग्रेसने भाजपच्या काही जागांवर विजय मिळवले. तर महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने भाजप आणि फुटीर मित्रपक्षांची वाटचाल यशस्वीरीत्या रोखून धरली. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात भाजपने बहुतेक जागा राखल्या. तर ओडिशामध्ये लक्षणीय यश मिळवले. आंध्रातही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडीचा त्यांना फायदा झाला. केरळमध्ये भाजपने खाते उघडले, पण तमिळनाडूत पक्षाची पाटी कोरीच राहिली.

राममंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत होणे, ही बाब बरेच काही दर्शवून गेली. नीतिशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या नेत्यांशी प्रामुख्याने तसेच रालोआ आघाडीतील इतरही नेत्यांशी आता मोदी आणि भाजपला सरकारजुळणीपासून चर्चा करावी लागेल. ‘अबकी बारङ्घ’ या भाजपच्या आवडत्या ललकारात आता निव्वळ मोदींऐवजी ‘आघाडी सरकार’ या शब्दांचा अनपेक्षित शिरकाव झाला.

मित्रपक्षांना महत्त्व

राम मंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत होणे, ही बाब बरेच काही दर्शवून गेली. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या नेत्यांशी प्रामुख्याने तसेच रालोआ आघाडीतील इतरही नेत्यांशी आता मोदी आणि भाजपला सरकारजुळणीपासून चर्चा करावी लागेल. ‘अबकी बार’ या भाजपच्या आवडत्या ललकारात आता निव्वळ मोदींऐवजी ‘आघाडी सरकार’ या शब्दांचा अनपेक्षित शिरकाव झाला.

दिग्गजांना पराभवाचा धक्का

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अर्जुन मुंडा, राजीव चंद्रशेखर, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, अजय मिश्रा टेनी या केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांच्याविरोधात क्रिकेटपटू युसूफ पठाणने विजय मिळविला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश आणि कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.

हा लोकशाहीचा आणि संविधानावरील विश्वासाचा विजय आहे. १९६२नंतर पहिल्यांदाच दोन कार्यकाळ पूर्ण करणारे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. एकवटलेल्या विरोधकांना एकट्या भाजपएवढ्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत. मोठ्या निर्णयांचा नवा अध्याय लिहिला जाईल, ही मोदीची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान