मुंबई : मुंबईमधील दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी अचानक दुपटीने वाढ झाल्यामुळे यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच पुढील १५-२० दिवसांत एकामागून एक येत असलेल्या सण-उत्सवांमुळे करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होण्याची भीती पालिकेला आहे. त्यामुळेच नागरिकांनी खबरदारी घेण्याचे तसेच करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने यंदा दहीहंडी, गणेशोत्सव आदी उत्सवांवरील निर्बंध हटविले आहेत. परिणामी, यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सर्व उत्सव पार पडणार आहेत. त्यामुळे गोविंदा पथके, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. अशात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे. बुधवारी एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत रुग्णसंख्या दुपटीहून जास्त वाढली आहे. पुढील आठवडय़ात दहीहंडी आणि ऑगस्टच्या अखेरीस गणेशोत्सव होत आहे. उत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे करोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सध्या कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर मध्येच पडणारे कडक ऊन यामुळे अनेकांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास होत आहे. परिणामी, करोना आणि साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे गरजेचे आहे, असे मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा विनाशुल्क उपलब्ध आहे. मात्र अनेकांनी अद्याप ती घेतलेली नाही. करोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहन वारंवार मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सव वा गणेशोत्सवावर यंदा कोणतेही करोनाविषयक निर्बंध नाहीत. मात्र पथके आणि मंडळांनी स्वत:हूनच बंधने पाळून आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, असेही पालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.