मुंबई महापालिकेने त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून ग्रामीण भागास विशेषत: शहापूर आणि भिवंडी तालुक्यास पाणी पुरवठय़ासाठी प्रयत्न करावेत, अशा आशयाची एक नव्हे तर तीन पत्रे जिल्हा प्रशासनाने पाठविल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या महापौरांनी मात्र असे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे सांगत कानवर हात ठेवले आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात या पत्रांचा गौप्यस्फोट केला होता.
२६ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून शहापूर तालुक्यात पाणी पुरवठयाची विनंती केली. त्यानंतर ८ एप्रिलला पाठविलेल्या पत्रात मुंबई पालिकेने शहापूर तालुका दत्तक घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आल्याचे समजते. मुंबई महापालिकेने आपल्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर्स अतिरिक्त पाणी भिवंडी महापालिकेस देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी १० एप्रिलला मुंबई आयुक्तांना पाठविले. मात्र या तिन्ही पत्रांना मुंबई पालिकेने प्रतिसाद दिला नाही, असे सूत्र सांगतात़
* मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई आहे. याबाबत मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
* मुंबई महानगर प्रदेशातील पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाने नेमलेल्या सुकाणू समितीने भिवंडी महापालिका हद्दीत मोडणाऱ्या ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारण्यासाठी तोडगा काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thrice thane has sent letters seeking water