मुंबई : टाटा एज्युकेशन ट्रस्टच्या (टीईटी) माध्यमातून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये (टीस) राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने शंभरहून अधिक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढण्याचा निर्णय संस्थेने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र ट्रस्टने निधी मंजूर केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हेही वाचा >>> विधान परिषद पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक; आज मतमोजणी वेतनासाठी दिले जाणारे अनुदान न आल्याचे कारण देत शुक्रवारी ५५ शिक्षक आणि ६० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात येत असल्याचे २८ जून रोजी सांगितले गेले होते. त्यानंतर रविवारी टाटा एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ट्रस्टने ४ कोटी ७९ लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवरील नोकरकपातीचे संकट टळले आहे. ‘टीस’ने २८ जून रोजी काढलेले पत्र मागे घेत शिक्षक व कर्मचाऱ्यांना काम सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. या कर्मचाऱ्यांना टीईटीकडून निधी पुरवण्यात येणाऱ्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. तर, टीसमधील उर्वरित शिक्षक हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार कायमस्वरूपी प्राध्यापक आहेत. ट्रस्टच्या आश्वासनानंतर हा प्रश्न मार्गी लागला असला तरी टीईटी प्रकल्पावर काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर संस्थेमार्फत काम करण्यात येईल. तसेच यूजीसीच्या नियमानुसार मंजूर पदांसाठी जाहिरातींच्या नियमित प्रक्रियेसह नियुक्ती करण्यात येईल, असे ‘टीस’मधील एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘सहा महिन्यांपासून प्रयत्न’ गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान सुरू ठेवण्याबाबत टाटा एज्युकेशन ट्रस्टशी अनेकदा संपर्क साधला. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अनुदान मिळत नसल्याने या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सेवा ३० जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे ‘टीस’ प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. आर्थिक साहाय्य उपलब्ध होताच तातडीने कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाईल, असे रविवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.