मुंबईः टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ११ हजार ३०० तक्रारदार आले आहेत. त्यामुळे या गैरव्यहाराची रक्कम १२० कोटींच्या घरात पोहोचली आहे. प्रत्यक्ष याप्रकरणात हजारो कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचा आरोपी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीनं हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. वर्षभर व्यवसायही केला. पण संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा केला. ‘टोरेस’ गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. याप्रकरणी नऊ विदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.

टोरेस गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा असून सामान्य नागरिकांची जन्मभराची कमाई पळवून परदेशात नेण्यात आली आहे. ही रक्कम परदेशातील खात्यांमध्ये हस्तांतरीत करण्यात आली असून त्यासाठी बेकायदा मार्गांचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. त्यावर सध्या तपास केंद्रीत आहे. संबंधीत बँक खाती व आरोपींशी संबंधीत मालमत्तांची माहिती घेण्याचे काम तातडीने करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

तक्रारदार भाजी विक्रेता वैश्य (३१) यांनी याप्रकरणी सव्वा लाख लोकांनी टोरेस कंपनीत पैसे गुंतवल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ११ हजार ३०० गुंतवणूकदार पोलिसांसमोर आले असून त्यांमुळे फसवणुकीची रक्कम १२० कोटींवर पोहोचली आहे. ईडी याप्रकरणी फेब्रुवारी २०१३ पासून प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहे. गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम रोख स्वरूपात आहे. ती दादर येथील शाखेत रक्कम जमा करून ती कथित स्वरूपात हवाला नेटवर्कद्वारे कूटचलनाद्वारे परदेशात पाठवण्यात आल्याचा संशय आहे. त्याबाबत ईडी तपास करत आहे.

टोरेसकडून अनेक गुंतवणूक योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यात दर आठवड्याला सहा टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई, आणि मीरा रोड येथील हजारो गुंतवणूकदार ६ जानेवारी रोजी टोरेसच्या दादर, मीरा रोड, आणि एपीएमसी नवी मुंबई येथील कार्यालयाबाहेर जमले होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांचे व्याज थकवले गेल्यामुळे आंदोलन केले. त्याच दिवशी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही रक्कम हजारो कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय मीरा भाईंदरच्या नवघर पोलीस, ठाण्याच्या राबोडी पोलीस, आणि नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी या सर्व प्रकरणाचा मिळून तपास करणार आहे.

Story img Loader